Friday, August 21, 2015

डेरिडा: चिन्हव्यवस्थेमार्गे छिन्न-अव्यवस्थेकडे


चिन्हव्यवस्था अस्तित्वात आहे आणि मानवी जीवनात ती फार महत्त्वाची आहे हे कोणीच नाकारणार नाही. पण फक्त चिन्हेच काय ती आहेत बाकी काहीच नाही अशी चिन्ह सत्यम जगन्मिथ्या भूमिका घेणे हे विक्षिप्तपणाचे लक्षण ठरेल. डेरिडा आणि कंपनी अशी भूमिका घेतात. या भूमिकेला आपण चिन्हसर्वस्ववाद हे नाव देऊ. हे करताना ते आपल्या एका (खरेतर मानीव) असहायतेचा गैरफायदा घेतात. आपण चिन्हेतर अशा कशाही विषयी काहीही सांगायला जावे तर ते सांगणे भाषेतच करावे लागते. यावर तुम्ही बोलताय तीही चिन्हेच आहेत की! असे म्हणून हे आपल्याला अडकवू पहातात. खरेतर भाषा म्हणजेच जीवन नव्हे हे सर्वांनाच विदित असते.

चिन्हव्यवस्थेचे विश्लेषण करण्यासाठी डेरिडा आणि मंडळी चिन्हक (सिग्निफायर) आणि चिन्हित(सिग्निफाइड) ही प्राथमिक जोडगोळी मानतात. आपल्याला वाटते की चिन्हवस्तू आणि चिन्हार्थ अशीच ही जोडगोळी असेल. पण अर्थापर्यंत पोहोचणे हेच अमान्य करीत
डेरिडा यात एक अनवस्था मानतो. त्याच्या मते चिन्हित हे स्वतः पुन्हा कशाचे तरी चिन्हक बनतेच मग त्याचे चिन्हित हे पुन्हा चिन्हक बनते व ही अंतहीन साखळी चालू रहाते. अंतिमतः चिन्हित (ट्रान्सेन्डेंटल सिग्निफाईड) काय? हा प्रश्न कायम अनुत्तरितच रहातो.

प्रत्यक्षात असे घडत नाही. तसे घडत असते तर आपण चिन्हव्यवस्था उपयोगात आणूच शकलो नसतो.

डेरिडा चिन्ह्कांच्या बाबतीतही एक अनवस्था मानतो. चिन्हक हे स्वतः कसे आहे याला महत्त्व नसून, चिन्हका-चिन्हकांमधील भेद व या भेदांची रचना हीच चिन्हव्यवस्थेला पुरेशी असते असा सिद्धांत डेरिडाचा पूर्वसुरी फर्दिनांद दि सोस्यूर याने मांडलेला होता. हे करताना चिन्हक हे केवळ संकेतानेच बनते व संकेत बदलताही येतात असे सोस्यूरने गृहीत धरले होते. हे गृहीत चक्क चुकीचे होते. चिन्हकाच्या निवडीवर इतर चिन्हकांशी भेद राखणे याचा एक दबाव असतोदेखील, पण तीच एक गरज असे नसते. 

साधर्म्य हे देखील महत्त्वाचे असते (उदा. तोडाशी संबंधित सर्व क्रियापदांचे उच्चार आणि त्या क्रिया यात निश्चित साधर्म्य असते जसे थुंकणे, गिळणे, शिंकणे, खाकरणे इत्यादी) तसेच कार्यकारण किंवा तत्सम संबंध असला तरी चिन्हकावरून चिन्हिताचे अनुमान काढता येते. तानाजीने दोर खेचून पाहिला व त्याला घोरपड घट्ट धरून आहे हे कळले यात लक्षणचिन्ह येते. गवताची गंज पेटवून देऊ तो जाळ दिसला की समजावे आम्ही गड घेतला आहे हे संकेतचिन्ह आहे. आणि गड आला पण सिंह गेला यात सिंह हे रूपकचिन्ह (साधर्म्याधिष्ठित) आहे. 

संकेतातील भेदांची रचना म्हणजेच चिन्हव्यवस्था हे सोस्यूरचे चुकीचे मत दुरुस्त करावयाचे सोडून डेरिडाने त्यावर आणखी एक सिक्सर मारली. भेदांची रचना ही स्थिर राहत नाही व गतीशील असते म्हणून नेमका भेद ओळखणे हे सतत लांबणीवर टाकावे लागते टु डिफर याचा एक अर्थ वेगळ्या वेळेसाठी राखून ठेवणे असाही होतो तो मधेच आणून डेरिडाने डिफरन्सच फक्त नसतो तर डिफेरान्स असतो असे म्हटले व त्यावरून चिन्हित(अर्थ) न सापडण्याला आणखी एक आधार शोधला. बुळबुळीत साबणाप्रमाणे अर्थ घट्ट धरायला जावा तर सटकतो, हा डेरिडाच्या सिद्धांताचा मुख्य मुद्दा आहे. 

आपण सामान्यतः असे समजतो की अर्थ हे मुळातच असतात व ते व्यक्त करण्यासाठी आपण भाषा वापरतो. डेरिडाच्या मते भाषा ही स्वयंभू व चंचल असून तीच आपल्याला नाचवत असते. अशा तऱ्हेने आपण माणसे म्हणजे कळसूत्री बाहुल्याच हे मत कायम राहते. खेळीया कोण याबाबत ईश्वराची जागा भाषेने घेतली जाते. तुम्ही म्हणाल की असे मानून आपण कुठे पोहोचणार? बरोबरच आहे. कुठेच पोहोचणार नाही. पण कुठे पोहोचू द्यायचेच नाही हीच उच्छेदवाद्यांची प्रतिज्ञा आहे व डेरिडा हाही एक उच्छेदवादीच आहे.

डेरिडाचे इतरही सिद्धांत आहेत ते म्हणजे

१. कोणताही विचार द्वय-विरोध-श्रेणी(बायनरी-ऑपोझिशन-हायरार्की) या त्रिकुटाने ग्रस्त असतो पण ही ग्रस्तता कधीच काढता येणार नाही किंवा श्रेणी उलटवूनही भागणार नाही अशी त्याचेच मत आहे. मग करायचे काय? तर हे त्रिकुट पुनःपुन्हा उघडकीस आणत रहाणे व द्वये-विरोध-श्रेण्या अमुकच प्रकारच्या आवश्यक नसतात हे दर्शविणे एवढेच विरचने(डीकन्स्ट्रक्शन)चे कार्य असते.

२. स्वतः मनातला अर्थ जाणवत असतानाच बोलणे व त्याच वेळी ती स्व-उक्ती ऐकणे ह्या अनुभवामुळे आपल्याला सत्य नावाचा एक आभास उत्पन्न होतो.(!) म्हणून वचनकेंद्री(फोनोसेन्ट्रिक) भाषाव्यवहारापेक्षा लेखन/वाचन-केंद्रित(ग्राफोसेन्ट्रिक) भाषाव्यवहार जास्त मोलाचा असतो. कारण एखादा मजकुर(टेक्स्ट) समोर असला की त्यासंबंधित सांगणारा व ऐकणारा हे दोघेही अनुपस्थित असतात व त्यामुळे त्या मजकुराला कसे वाचायचे किंबहुना मजकुराशी कसे खेळायचे याचे स्वातंत्र्य वाचकाला असते. उपस्थितीवर आधारित स्वरूपशास्त्र(मेटॅफिजिक्स ऑफ प्रेझेन्स) नाकारले पाहिजे.
हा डेरिडाचा मुख्य सिद्धांत आहे.

पण या इतर सिद्धांतांकडे वळण्याअगोदर त्याने भाषाशास्त्रातच चिन्हव्यवस्थेचे स्वरूप समजाऊन घेण्यात जो घोटाळा करून ठेवला आहे तो निस्तरणे उपयुक्त ठरेल. कारण चिन्हव्यवस्था म्हणजे काय हे समजून घेण्यात केलेल्या घोटाळ्यांवर त्याने केलेले नंतरचे घोटाळे अवलंबून आहेत.

जीवन-प्राथम्य
आपल्याला जी भूक लागते ती काही प्राण्यांना पोषण लागते या तथ्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लागत नाही. चिन्हव्यवस्थेचा प्रश्नच नसणाऱ्या प्राण्यांनाही ती लागतेच व आपल्यालाही लागते. भूक हे चिन्हक नाही ती स्वतःच एक अर्थपूर्ण गोष्ट आहे. जीवनातील विविध गोष्टीना असणारी अर्थपूर्णता ही चिन्हनिरपेक्षपणेदेखील आहे. अर्थपूर्णतेवर चिन्हव्यवस्थेचा (कधी नको इतका) प्रभाव पडतो हे जरी खरे असले तरी अर्थपूर्णतेचे अस्तित्व मुदलात स्वयंभू आहे. खरेतर हे वाक्य मुद्दाम म्हणावे लागणे ही एक दुर्दैवाची बाब आहे. माणसाने संकेतांचा शोध लावून माणसामाणसांतले कम्युनिकेशन अधिक समृध्द केले कारण कशाचे प्रतिनिधित्व कशाने करावे याची कक्षा, नैसर्गिक आविर्भावांच्या तुलनेत खूपच विस्तारली हे खरेच. पण याचा अर्थ असा नाही की जीवन हे मात्र-संकेताधिष्ठित बनले.

मुळात कम्युनिकेशन म्हणजे काय ते पाहू. मला स्वतंत्र जाणीव आहे तशीच जाणीव समोरच्या व्यक्तीलाही आहे. त्याच्या जाणीवेत मला आणि माझ्या जाणीवेत तिला उपस्थिती आहे. मी काही कृती करण्याच्या आधीच, तशी कृती करू इच्छितो, हे जर तिला(म्हणजे त्या व्यक्तीला) कळले तर तिचे सहकार्य मिळविणे आणि सांघिक कामगिरी करणे शक्य होईल. माझ्या जाणीवेतले काही दुसऱ्याच्या जाणीवेत पोहोचवणे हे दोघानांही अत्यंत लाभदायक असते. इतकेच नव्हे तर अनुभव सहप्रचित(शेअर) करायला मिळणे याला स्वतोमूल्य देखील आहे.

माणसाहून कितीतरी कमी विकसित प्राणी सुध्दा त्याच्या मर्यादेत हे साधत असतात. कम्युनिकेशनला अगदी तत्त्वतः उचित शब्द अन्य-चित-संधान हा ठरेल. आपण चित्संधान एवढाच ठेवू (संद्यापन म्हटले तर त्यात संज्ञा आल्याच असे वाटू शकते. पारेषण म्हटले तर टेलिकम्युनिकेशन वाटू शकते. जाणीव ही गोष्ट एलीमिनेट होईल असे काहीही नको म्हणून चित्संधान म्हणावे. सांकेतिक चिन्हे हे साधन नसतानाही चिन्हेतर स्वरूपांत चित्संधान साधले जात असते. किंबहुना ते तसे साधले जात असल्यानेच आपण संकेत ठरविणे ही गोष्ट करू शकतो. संकेताचा ठराव मांडण्यासाठी संकेतपूर्व असे काही सहप्रचित लाभलेले असावे लागते. म्हणजेच चिन्हव्यवस्थेला अचिन्ह चित्संधानाचा आधार लाभतो म्हणूनच चिन्हव्यवस्था शक्य होते.

यात मी अंतर्ज्ञान किंवा टेलीपथी असले काही धरत नाहीये. किंबहुना सार्वजनिक प्रत्यक्ष हे प्रमाण ज्ञान बनते ते कोणालाही सहप्रचिती मिळू शकते म्हणूनच! चिन्ह सत्यम अर्थ मिथ्या असे मानणाऱ्याना ही साधी गोष्ट कशी लक्षात येत नाही याचेच आश्चर्य वाटते.
दोन किंवा जास्तसुध्दा माणसांना एकाच वेळी तिसऱ्या एखाद्या गोष्टीची सहप्रचिती येऊ शकते (को-एक्स्पीरिअन्सिंग) तसेच त्यांना एकमेकांची थेट प्रचीती (डायरेक्ट म्युच्युअल एक्स्पीरीअन्सिंग) येणे देखील घडत असते.

समजा दोघे आर्म्सरेसलिंग करत आहेत. त्याचा जोर कमी पडू लागला आहे म्हणजेच मला आत्ता जोर करायला संधी आहे हे मला कोणत्याही अन्य माध्यमातून किंवा तिसऱ्या कशाने तरी त्याच्या जोराचे प्रतिनिधित्व केल्याने कळत नसते तर मला आलेला माझ्या प्रतिस्पर्ध्याचा थेट अनुभव असतो. जिवंत-परस्परानुभव येणे हे झगड्यात, प्रणयात वात्सल्यात व सांघिक श्रमात होतच असते. हे ट्रान्सअनिमेशन अचिन्ह-चित्संधानाचा महत्त्वाचा आधार असते.

चिन्हसर्वस्ववादी लोक या अनुभवांची देखील चिन्हांचाच आणखी एक प्रकार अशी संभावना करू पहातात. ते लक्षण/गमक/द्योतक (डीफाइनिंग फिचर, सिम्प्टम, इंडिकेटर) आणि चिन्ह (साईन) यात घोळ घालत असतात. लक्षणे ही कोणत्याच चिन्हव्यवस्थेवर अवलंबून नसतात. ती वस्तुतःच असतात.

सम्यक चिन्हमीमांसा  
निर्देशक आणि निर्दिष्ट हा संबंध मुळात वर म्हटलेल्या सहप्रचितीमध्ये जो अंगुलीनिर्देश केला जातो तेथून सुरु होतो. अंगुलीनिर्देश करणे हाही संकेत आहे असे चिन्हसर्वस्ववादी म्हणतात. म्हणून आपण कुत्र्याचे उदाहरण घेऊ. कुत्रा मालकापाशी येऊन भुंकू लागतो. त्याच वेळी तो मालकाची पँट तोंडात धरून ओढू लागतो. त्याला आपल्याला काहीतरी दाखवायचे असते. तो ओढत नेतो आणि मालकाच्या दृष्टीने लक्षणीय(सिग्नीफिकंट), अर्थात कुत्र्याच्या समजेनुसार, गोष्ट दाखवतो. कोणालाही नेऊन मूळ गोष्टच दाखवणे यात दुसऱ्या कशानेतरी तिचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रश्नच नसतो. बघा बघा तुम्हीही बघा हे कम्युनिकेशनचे आदिवाक्य म्हणता येईल. एखाद्या भाषापूर्व मानवाला दुसरा भाषापूर्व मानव हे फळ विषारी आहे. खाऊ नकोस. हे कसे सांगेल याचे माईमिंग शाळेतील पोरे सुध्दा करून दाखवतील! वाचकांनीही गंमत म्हणून करून बघायला हरकत नाही.   

जे मूर्त आणि समक्ष असेल व प्रस्तुत आणि लक्षणीयही असेल ते चिन्हव्यवहाराशिवायही अनुभवता येते. जे मूर्त नाही आणि समक्षही नाही पण प्रस्तुत आणि लक्षणीय आहे, ते व्यक्त करण्यासाठी, म्हणजेच अन्यांच्या जाणीवेत आणण्यासाठी, प्रतिनिधित्व करणे हा प्रश्न येतो. म्हणून अमूर्त असमक्ष प्रस्तुत आणि लक्षणीय असे जे ते निर्दिष्ट होय व त्याचा निर्देश ज्या कोणत्या मूर्त समक्ष गोष्टीने करायचा ते निर्देशक ठरते. निर्देशक हा शब्द आपण ज्याला चिन्हक म्हणतात त्याच्या जागी व निर्दिष्ट म्हणजे ज्याला चिन्हित म्हणतात त्यासाठी वापरत आहोत. मग हे वेगळे शब्द का वापरायचे? याचे कारण असे की चिन्हक-चिन्हित यात चिन्हिताला स्वतःची अशी अर्थवत्ता आहे की नाही हे संदिग्ध राहते. तसेच चिन्हक हे संकेताने आहे रूपकाने आहे लक्षणाने आहे की भिन्नता टिकवण्यासाठी आहे हेदेखील चिन्हकातच गडप होते व चिन्हसर्वस्ववाद्यांना घोळ घालायला मोकळे रान मिळते.

मी चिन्हक-चिन्हित या जोडीच्या जागी एक चतुष्टक योजित आहे.  

१) निर्दिष्टाची (जीवनातली) लक्षणीयता सिग्निफिकन्स म्हणजेच अर्थ
२) निर्दिष्टाचे स्वरूप म्हणजे जागृत केली गेलेली संकल्पना (इनव्होक्ड कन्सेप्ट)
३) निर्देशकाचे स्वरूप म्हणजे समक्ष सादर केली जाणारी प्रतिमा(प्रेझेंटेड इमेज)  
४) निर्देशकाचे औचित्य(संकेत, रूपक, लक्षण आणि भेदरचनेसाठी लागणारे वेगळेपण) याला मी सिग्नीजियन्स असा इंग्लिश शब्द नव्याने बनविला आहे.

या चौपदरी रचनेमुळे चिन्हसर्वस्ववाद्यांनी घातलेला घोळ कसा दूर होतो ते आता पाहू.
निर्देशकावरून निर्दिष्टावर ही क्रिया होतेच. पण समजा त्या निर्दिष्टातून नवा निर्देशक उपटला आणि त्याचे निर्दिष्ट आणखी काही असले व असा चिन्हखेळ सुरु झालाच तरी त्यातील साखळ्यांपासून, दरवेळी, निर्दिष्टाची  लक्षणीयता (सिग्नीफिकन्स) व निर्देशकाचे औचित्य(सिग्नीजियन्स) ही दोन्ही महत्त्वाची मंडळी बाहेर सुरक्षित राहतात. इतकेच नव्हे तर दरवेळी लक्षणीयता आणि औचित्य वेगळे कळत राहून ते साखळीत गडप होत नाही किंवा भेदांच्या रचनेतही गडप होत नाहीत. सोस्यूरने आपले १ व २ या दोन्हीला मिळून चिन्हित म्हटले आणि ३ व ४ या दोन्हीला मिळून चिन्हक म्हटले ही सोस्यूरची चूक होती. ही चूक केल्यानेच तो चिन्हव्यवस्था म्हणजे फक्त भेदांची रचना या संरचनावादी मांडणीत घुसला. ही संरचनावादी मांडणी गतीशील नाही असे म्हणत डेरिडाने उत्तर-संरचनावाद मांडून अंतहीन खेळ व सटकणारा अर्थ या भानगडी आणल्या. पण मुदलात चिन्हव्यवस्था आणि जीवन यांच्यात नेमका काय संबंध आहे हे दोघांनीही गुलदस्त्यात(ओब्स्क्युअर्ड) ठेवले. माझ्या पद्धतीत  लक्षणीयता(सिग्नीफिकन्स) या पदाने अर्थ चिन्हव्यवस्थेपासून स्वतंत्र राखला आणि औचित्य(सिग्नीजियन्स) या पदाने संकेत की रूपक की लक्षण की रचनेचा दबाव हे प्रश्न खुले ठेवले. म्हणजेच मी चिन्हव्यवस्थेच्या विचाराला जीवनात स्थापित करू बघतोय तर त्यांनी जीवनच चिन्हव्यवस्थेत गडप केले.

निर्देशकाचे औचित्य (सिग्नीजियन्स) हे त्या प्रतिमेशी यादृच्छिक साहचर्य(असोसियेशन) असलेल्या प्रतिमा व अशा प्रतिमांच्या वापराच्या परंपरेने बनलेली वापराने बनलेल्या एकूण रेखीव नसलेल्या (अमॉर्फस) संदर्भमयतेमुळे लाभत असतो. संरचनावादी भाषाविज्ञानामुळे नव्हे. तसेच निर्दिष्टाची लक्षणीयता (सिग्नीफिकन्स) ही ज्यांच्यात चित्संधान चालू असते त्यांच्या जीवनातील प्रसंगांमुळे ठरत असते चित्संधानासमवेत ज्या कृत्ती घडतात त्या कृतीच अर्थनिर्णयन पक्के करतात किंवा प्रश्नांकित करून खुलेही करतात. अशा तऱ्हेने चिन्हव्यवस्था ही दोन्ही अंगांनी जीवनात बसती केली जात जात घडत असते. तिला जीवनबाह्य व आकारिक तार्किक बनवून तीत अनवस्था वगैरे दोष आहेत असे भासू लागते. समजून घेणाऱ्या जिवंत व्यक्ती अनवस्था होऊ देत नाहीत अन्योयाश्रय समजून घेतात द्विरुक्ती व व्याघातही आलंकारिक म्हणून उपयोगात आणतात.

संरचनावाद आणि उत्तर-संरचना वाद हे दोन्ही जीवनबाह्यतेच्या दोषाने ग्रस्त आहेत व नसलेल्या समस्या निर्माण करून जनतेला उगाचच भेडसावू पहात आहेत. भाषेतून जीवन काढून घेतले तर अर्थ कधीच गवसणार नाही हे खरेच आहे. पण निरर्थकतेतच किंवा  असारतेतच ज्यांना साफल्य वाटते त्यांना हे वाद म्हणजे विद्रोहाची थोर साधने वाटतात.

डेरिडाने कलुषित ठरविलेले(स्कँडलाईझ केलेले) त्रिकुट: द्वय-विरोध-श्रेणी(बायनरी-ऑपोझिशन-हायरार्की)

एखाद्या संहितेची(टेक्स्ट) विरचना (डीकन्स्ट्रक्शन) केली म्हणजे मूळ संहितेपासून विरचित झालेली संहिता हातात पडेल असे आपल्याला वाटते. पण विरचनेचा अर्थ तसा नसून रचना उघडकीस आणणे एवढाच आहे. संहितेच्या रचनेत वरील त्रिकुट कसे दडलेले आहे हे शोधून काढणे म्हणजे विरचना. पण त्रिकुट सापडले तर पुढे काय? पुढे एवढेच की संहिता नमुनेदार मान्यतांवर आधारित आहे आणि म्हणून तिच्या कोणत्याच अर्थांकनाला सार्विक अशी वैधता नाही. कारण वेगळी द्वये व त्याच्यातील विरोधी पदामध्ये वेगळी उच्चनीचता देखील असू शकते. माझ्या मते या त्रिकुटाला कलुषित ठरविणे आणि वैध अर्थांकन अशक्य मानणे म्हणजे मानवांमध्ये संवादाने सहमती होऊ शकते हेच नाकारणे ठरते. खरे तर या त्रिकुटात आक्षेपार्ह असे काही नाही.

डेरिडा म्हणतो हे त्रिकुट पाश्चात्य स्वरूपशास्त्रावर/अतिभौतिकीवर (वेस्टर्न मेटॅफिजिक्सवर) आधारित असते व त्याचा पगडा मनावरून काढला पाहिजे. मला यात खास करून पाश्चात्य व खास करून स्वरूप-शास्त्रीय(अतिभौतिक) असे काहीही दिसत नाही. हे त्रिकुट इतके स्वाभाविक आहे की त्यासाठी पाश्चात्यच काय पण मानव असण्याची सुध्दा गरज नाही. एखादा चित्ता आता पाठलाग करत असलेली शिकार सोडून देण्यात वाचणारी ऊर्जा आणि ती शिकार मिळाल्यास ती खाऊन मिळणारी ऊर्जा यात अधिक लाभदायक ऑप्शन कोणता याचा विचार किंवा गणित करून निर्णय घेतो. त्याला चिन्हव्यवस्था नसेलही पण बुद्धीच नसते असे नाही. 

प्राणी अनेक बुध्दिमान वर्तने करू शकत असतात. किंबहुना योग्य निर्णय न घेता चित्ता हा चित्ता म्हणून टिकूच शकला नसता. निर्णय घ्यावे लागतात हे सत्य एकदा मान्य केले की काय काय होते ते पाहू. उपलब्ध विकल्पांतून एक निवडून त्याचा संकल्प करावाच लागतो. विकल्प दोनापेक्षा अधिकही असू शकतात. पण त्यातील जास्तच त्याज्य विकल्प त्यागले जात जात दोन तुल्यबळ विकल्पांतून एक निवडायची वेळ येतेच. विकल्प किमान दोन असावे किंवा उरावे लागतात यातच द्वय म्हणजे बायनरी हा पदार्थ स्थापित होतो. एक त्यागायचा व दुसरा आंगिकारायचा आहे म्हणजे त्याच्यात विरोध म्हणजे ऑपोझिशन आलेच. त्यापैकी जो निवडला तो त्यागलेल्यापेक्षा श्रेष्ठ मानला जातोच म्हणजेच श्रेणी म्हणजे हायरार्की आलीच! तेव्हा द्वय-विरोध-श्रेणी हे त्रिकुट निर्णय नावाच्या अपरिहार्य जीवनांगाचे अंगभूत स्वरूप आहे. हे त्रिकुट टाळता येत नाही हे तर खुद्द डेरिडाही खिन्नपणे मान्य करतो. यात खिन्न होण्यासारखे काही नाही असे मला वाटते.

श्रेणी म्हणजे हायरार्की ही गोष्ट समतावाद्यांना त्यामुळे विद्रोही विचारकांना आणि त्यामुळे उच्छेदवाद्यांना (सबव्हर्सिविस्ट्स) एका नकारात्मक भावनेनेच बघता येते. पुरुष आणि स्त्री हे द्वय आले की पुरुषश्रेष्ठत्ववादाचा वास आलाच. हा क्रम स्त्री आणि पुरुष असा बदलला तरी मुद्दाम क्रम बदलून जेन्डरसेन्सेटिविटीचा आव आणलाय असाही वास येतो! वाद आणि कथा म्हटले की वाद हा रॅशनल आणि कथा म्हणजे दुय्यम. इतकेच काय पण  शब्दापेक्षा भावार्थ महत्त्वाचा असे म्हटले तरी कोणतेतरी प्रभुत्व(हेगेमनी) किंवा बलधरता(डॉमिनेशन) शिरू लागले की काय असे भय हायरार्की म्हणजे वाईटच असे मानणाऱ्याना वाटू लागते. विशेष असे की जे सार्विक(युनिव्हर्सल) असते ते अभिजनांच्या बाजूने व जे गटविशिष्ट(पॅरॉकियल) असते ते जनांच्या बाजूने पडते असा एक सिद्धांतच गोपाळ गुरू या नावाच्या गुरुजींनी मांडला आहे. आधुनिकोत्तर या नावाने जे विविध प्रवाह आहेत त्यांत श्रेणी पकडा स्पर्धा आयोजित केल्यासारखे काम चालू असते. या साहित्यात हमखास येणाऱ्या काही जोड्यांची यादीच पुढे देत आहे. ही यादी कितीही वाढवता येईल.
तसेच कोणते पद श्रेष्ठ याची अदलाबदल करता येईल.        

     
Hierarchical-Oppositional-Binaries      श्रेणीमय-विरोधी-द्वये  
1)    Letter & Spirit                  शब्दशः अर्थ आणि भावार्थ
2)    Word & Meaning                शब्द आणि अर्थ
3)    Body & Soul                    शरीर आणि आत्मा
4)    Appearance & Essence         प्रतीयमान आणि सारभूत
5)    Appearance & Reality         प्रतीयमान आणि वास्तव 
6)    Opinion & Knowledge            मत आणि ज्ञान
7)    Appeal & Argument          आवाहन आणि युक्तिवाद
8)    Emotion & Thinking          भावना आणि विचार
9)    Senses & Intellect             संवेदना आणि बुद्धी
10)  Indirect & Direct             आडवळणी आणि थेट
11)    Want & Need                 आकांक्षा आणि नड
12)    Survive & Thrive                तगणे आणि फुलणे
13)    Form & Content                आकार आणि आशय
14)    Attribute & Substance            गुण आणि द्रव्य
15)    Absence & Presence           अनुपस्थिती आणि उपस्थिती
16)    Parochial & Universal           गटधार्जिणे आणि सार्विक
17)    Elites & Masses                 अभिजन आणि जन
18)    Masses & Elites              जन आणि अभिजन (उलटीही श्रेणीच)
19)    Particular & General              विशेष आणि सामान्य
20)    Concrete & Abstract               मूर्त आणि अमूर्त
21)    Profane & Sacred               अपवित्र आणि पवित्र
22)    Mundane & Extraordinary         लौकिक आणि अलौकिक
23)    Earthly & Heavenly                पार्थिव आणि दिव्य
24)    Essential & Contextual             सारभूत आणि संदर्भमय
25)    Induction & Deduction              विगमन आणि निगमन
26)    Contingent & Necessary           आपातिक आणि अनिवार्य
27)    Analytic & Synthetic            व्याख्यादत्त आणि तथ्यगामी
28)    A-posteriori & A-Priory   घटितावलंबी आणि घटित-अनावलंबी
29)    Down & Up                        खाली आणि वर
30)    South & North                                दक्षिण आणि उत्तर
31)    Background & Figure            पश्चभूमी आणि लक्ष्याकृती
32)    Approximate & Exact                 अदमासे आणि अचूक
33)    Associative & Logical       साहचर्याधिष्ठित आणि तर्काधिष्ठित
34)    Unknown & Known                    अज्ञात आणि ज्ञात
35)    Conditional & Unconditional      सोपाधिक आणि निरुपाधिक
36)    Practice & Theory                                     व्यवहार आणि सिद्धांत
37)    Rural & Urban                       ग्रामीण आणि नागर
38)    Vulgarity & Fineness             आडदांड आणि नजाकतदार
39)    Amorphous & Crystalline          ढिगार आणि स्फटीकवत
40)    Unconscious & Conscious       नेणीवेतील आणि जाणीवेतील
41)    Narrative & Discursive           कथनात्मक आणि चर्चात्मक

या सर्व जोड्या महत्त्वाच्या आहेत यात शंकाच नाही. पण द्वय म्हणजे तुटकपणाच, विरोध म्हणजे वैरच आणि श्रेणी म्हणजे कशाची तरी अवहेलनाच असे मानून बसण्याची गरज नाही. मात्र उच्छेदवादी तुटकपणा वैरात्मकता आणि अवहेलना असा या त्रिकुटाचा अर्थ लावून दुःखी होतात व इतरानाही दुःखी करतात. एखादी गोष्ट सलगपणे बदलती असली तरी तिचे विश्लेषण करताना टप्पे पाडावे लागतात. पण ही तार्किक गरज असते याचा अर्थ असा नव्हे की आपण तुटकपणे बघू लागतो. विरोध हे दरवेळी वैरात्मक तर नसतातच पण परस्परपूरकही असतात. चढ आणि उतार ही एकाच तथ्याची दोन अंगे आहेत. विरोध हे परस्परप्रवेशीसुध्दा असतात. कोणत्याही प्रसंगी कशाला महत्त्व द्यायचे याचा निर्णय करावा लागतो पण याचा अर्थ असा नव्हे की आपण कायमस्वरूपी कशालातरी हीन लेखण्यासाठी महत्त्व जोखतो.

ध्वनीकेंद्री(फोनोसेन्ट्रिक) आणि सार्विक-सत्य-केंद्री(लोगोसेन्ट्रिक) असण्यात वाईट ते काय?

आपण स्वतःच्या उक्तीला अर्थ देताना ती करण्यासाठी यत्न करताना आणि तिचे उच्चारण ऐकताना एकदमच साक्षी असतो हे तर वरदानच आहे. यत्न, भोग, बोध आणि सच्चेपणा यांची एकतानता अनुभवायला मिळणे हे आपल्याला एकसंध व्यक्तिमत्व घडवायला उपकारकच नाही काय? ध्वनीकेंद्री भाषाव्यवहाराला पाश्चात्य म्हणणे हे कोणाही भारतीयाला विनोदी वाटेल. मौखिक परंपरेचा नको इतका बडेजाव हा पाश्चात्य नसून उलट खास भारतीय आहे. मंत्रोच्चाराने निसर्गाचे पासवर्ड उघडतात ही अंधश्रद्धा तर फोनोमोर्फिक म्हणावी लागेल. 

सार्विक सत्य असते म्हणजे ते एकदाचे आणि कायमचे ठरून गेलेले असते असे मानण्याचे काहीच कारण नाही. ते आव्हानित होत रहाणे आणि अधिकाधिक सुधारित होत रहाणे हे महत्त्वाचेच आहे. पण सार्विक सत्य ही बातच नस्से म्हटल्यावर आरोग्यपूर्ण वादविवाद आणि त्यातून परस्परांना अधिकाधिक सत्याजवळ आणि एकमेका जवळ आणणे हा प्रकल्पच नाकारला तर दमनरहित मानवी समाज हा आदर्श सिद्धांततःच नाकारणे ठरेल. या प्रकल्पाला परिपूर्णता येईल असे मी म्हणत नाही पण हा प्रकल्प पुढे जात आहे की नाही? माझ्या मते तो धीमी गतीसे मगर निश्चित रूपसे (रनसंख्या बढती हुई हे हिंदी क्रिकेट कोमेंटरीवरून घेतले) पुढे जातो आहे. सहप्रचिती आणि परपस्परप्रचिती या आपल्याला लाभलेल्या शुभशक्ती आहेत. त्यांचे अस्तित्व नाकारून आणि लहरी सापेक्षतावादाच्या मागे लागून आपण काय साधणार? 

पण फोनोसेन्ट्रिक आणि लोगोसेन्ट्रिक हे शब्द डेरिडा आणि मंडळी शिव्यांप्रमाणे वापरतात. युरोपात काय चालले आहे याची जुजबी माहिती घेऊन एक/कितीतरी अंश हळकुंडाने पिवळे होणारे लोक जणू काही आपल्याला क्रांतीचे हत्यारच गवसले अशा थाटात डेरिडा फेकू लागतात तेव्हा आपण काय करतो आहोत याची पुरेशी जाणीव त्यांना नसते आणि जबाबदारीचे भानही नसते.

माझे डेरिडाविषयक आकलन कमी पडलेले असू शकते. हे लोक इतके किचकट व आडवळणी लिहितात की आपल्या कळले नाही? की कळणे ही गोष्टच थोडी कमअस्सल असते? हेही कळेनासे होते. परंतु भाषाविज्ञान आणि साहित्यसमीक्षा क्षेत्रातील मान्यवर प्राध्यापक डॉ हरिश्चद्र थोरात यांनी साहित्याचे संदर्भ या ग्रंथात डेरिडा जो लेख लिहिला आहे त्यातील निष्कर्ष माझ्या निष्कर्षांशी खूपच मिळता जुळता आहे हे पाहून मला एक दिलासा वाटतो.

  •        

Friday, August 14, 2015

‘जी.एम.’ बियाणे: मिथक आणि वास्तव

भारतीय कृषिविद्यापीठांतील वैज्ञानिकांनी प्रोटीन व ए-विटामिनयुक्त तांदूळ   (बालकांतील अंधत्वाचे महत्वाचे कारण ए-विटामिनची डेफिशियन्सी हे आहे.) लोहयुक्त केळी, तांबेरा रोग प्रतिबंधक सोयाबीन आणि अशी अनेक उत्तम बियाणे बनविली आहेत. बियाणे बनवणाऱ्या कंपन्या भारतीयच आहेत. जनुकाची रॉयल्टी हा घटक बियाणाच्या किमतीत खूप लहान असतो व ती रॉयल्टीदेखील बऱ्याच अंशी भारतीयांनाच जाणार आहे.

भारतातील सर्व कापूस हा बोंडअळी प्रतिबंधक जनुकीय बियाणानेच बनतो. मॉन्सँटोला घालवल्यानंतर त्यांचे तंत्र चोरून भारतीय कंपन्यांनी हे कापूस बियाण प्रचलित केले. अटलजींनी बीटी कापसाला अधिकृत परवानगीही दिली. दहाहून अधिक वर्षे हा कापूस पिकतो आहे. माणसे त्याचे सरकी तेल वापरत आहेत. गुरे पेंड खाऊन दूध देत आहेत. शेळ्या झुडुपे खाऊन शेतं साफ करत आहेत. कोणालाही काहीही झालेले नाही. ज्या ग्रीनपीस संस्थेने मुळात जनुकीय बियाणांना विरोध सुरु केला तिचे संस्थापक सदस्यदेखील पश्चात्ताप व्यक्त करून जनुकीयचा प्रचार करत आहेत.

‘स्वदेशी जागरण मंच’ या संघपरिवारातील संघटनेने या नव्या तंत्राच्या चाचण्यावरही बंदी घालायला लावली आहे. मोदीसाहेबांचा विकासवादी दृष्टीकोन असला तरी त्यांना परिवारातूंच ब्रेक लावला गेला आहे. विषारी कीटकनाशके मात्र यांना विदेशीही चालतात. जनुकीय बियाणांविषयी घबराट पसरवणारा धादांत खोटा सिनेमा महेश भट्ट यांनी काढला आहे. जे धोके स्वदेशीवादी व्यक्त करतात ते कसे अ-वैज्ञानिक आहेत हे स्पष्ट करणारा लेख मी लोकसत्तात प्रसिध्द केला होता. तो पुढील लिंकवर आवर्जून पहावा. पश्चिमद्वेषापायी भारतीय उत्पादक, ग्राहक व शेतकरी यांना विज्ञानवंचित ठेवून  स्वराष्ट्रघात कसा चालू राहू शकतो याचे हे एक उदाहरण आहे.  

कलात्मक स्वातंत्र्यवीर (सेन्सॉर नकोच मानणारे) महेश भट्ट यांनी वैज्ञानिक-संशोधन-स्वातंत्र्य नाकारणारी व बेधडकपणे हिरोशिमा, पूर, भूकंप, महायुध्द, ९/११ यांचा जी.एम.शी बादरायण संबंध जोडत प्रलय-घबराट पसरवणारी, थालीमे जहर नावाची फिल्म बनविली आहे. त्यात उल्लेखिलेला जीएम खाऊन उंदरांना कॅन्सर झाल्याचा शोधनिबंध आता मागे घ्यावा लागलेला आहे. कारण त्यात मुद्दाम अगोदरच कॅन्सरप्रवण असलेले उंदीर वापरल्याचे उघडकीस आले. फिल्ममधील बाकी बडबड आध्यात्मिक गुरू आणि एन्जीओसम्राटांची आहे.  

आज आपण ज्या मित्र जीवाणूची ओळख करून घेणार आहोत तो कसदार शेतजमिनीतला कस समृध्द करणारा  कृषि-जीवाणू आहे. कीटकनाशके, शत्रु-कीटकांबरोबर मित्र-कीटक व मित्र-जीवाणूसुध्दा नष्ट करतात. शत्रू जीवाणू  मात्र हळूहळू त्यांना दाद देईनासे होतात. कीटकनाशके ही चक्क विषेच असतात. असे असूनही पर्यावरणवाद्यांना ती सुखेनैव चालतात!

जीवाणू (बॅक्टेरिया) हा उत्क्रांतीच्या अगदी आदीम टप्प्यावर अस्तित्वात आलेला आणि आजही प्रचंड प्रमाणात यशस्वीपणे जगणारा जीवप्रकार आहे. आपली त्याच्याशी पहिली ओळख होते ती रोगजंतू म्हणून. ऍंटिबायोटिक घेतल्यानंतर मित्रजीवाणूंचे पुनर्भरण करण्यासाठी जास्त दही-ताक किंवा मित्रजीवाणूच्याच गोळ्या घ्याव्या लागतात. विरजण, किंवा ब्रेड वा अल्कोहोल बनवतानाचे यीस्ट-जीवाणू हे उपयोगी साधन म्हणूनही आपल्याला माहित असतात. निरोगी शरीरातसुद्धा आपल्या पेशींपेक्षा जास्त जीवाणू असतात. आपले मोठे आतडे हा तर एक पर्यावरणीय अधिवासच असतो.

पण हे काहीच नाही तर आपल्या पेशींच्या आत, आपले गुलाम बनलेले मायटोकॉंड्रिया नामक जीवाणू, चक्क आपली कामे करत असतात. शुक्राणूमध्ये (किंवा शुक्रजंतू) वळवळती गतिमानता कोठून येते? चक्क मायटोकॉंड्रियाचे इंजिन बसवले जाते. म्हणजे जननपेशी पुरुषाची पण तिचा वाहक चक्क वेगळा जंतूच असतो! आपले स्नायू यांत्रिक ऊर्जा बनवू शकतात तीही मायटोकॉंड्रियांच्याच जीवावर! वरील कारणांमुळे जीवाणू हा जीवप्रकार मित्रही ठरतो हे तर झालेच. पण शरीराच्या किंवा खाद्यपेयांच्या बाहेरही मित्रजीवाणू अस्तित्वात आहेत. जैव-खते (सेंद्रिय म्हणू नये! कारण मूळ शब्द इंद्रिय-ऑर्गन हा नसून जीव-ऑर्गॅनिझम हा आहे) बनविताना त्यांचे हे कार्य सहजच दिसून येते. विष्ठेची विधायक विल्हेवाट लावणाऱ्या टाकीला सेप्टिक-टँक म्हणतात ते यामुळेच.


कृषि-जीवाणूचे (अॅग्रोबॅक्टेरियम) महात्म्य
जीवनसंघर्षात आतून हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना परोपजीवी (परासाईट) म्हणतात. या चोरांना आत शिरण्यासाठी यजमान जीवाचे कुलूप फोडावे लागते. एकाच नंबराचे कुलूप फोडायला एकदा शिकले की झाले. पण दर व्यक्तीगणिक मोठा आणि अनन्य नंबर असला की घरफोडी कठीण. जे जीवाणू एकमेकांशी बोगदा जोडून व जनुकांची देवाणघेवाण करून अनेकानेक नंबरांची कुलपे बनवू शकले ते जिंकले. यातून त्यांना यजमानपेशीतून जनुक-तुकडाही पळवून आणायचा/टाकून द्यायचा अशी सवय लागली. असले धंदे करणारा व्रात्य जीवाणू म्हणजे कृषिजीवाणू होय. हे भरपूर प्रकारचे असतात. ते जे उद्योग करून ठेवतात त्यात मनुष्याला उपकारक की मारक असा विवेक करण्याची कोणतीही सोय नसते. ज्या जाती नत्रवायूचे ग्रहण चांगले करतात त्यांच्या मुळांवर, म्हटले तर एक, रोगच जडलेला असतो, हे आपण शाळेतही शिकतो. हा कृषिजीवाणू जनुकीय बदल घडवून काही वनस्पतींचा नाश तर काहींचा बेलगाम प्रसारही करू शकतो. अमेरिकन गव्हाबरोबर भारतात आलेले काँग्रेस गवत आठवत असेल.

कृषिजीवाणूंनी चालवलेल्या आंधळ्या जनुकांतर-धुमाकुळाच्या(जीन ट्रान्सफर केऑस) सर्व भल्याबुऱ्या परिणामांतून काय होते? उत्तर आहे उत्क्रांती! छोट्या जनुक-माला मोठ्या होऊन उच्चतर बहुपेशीय जीव बनत गेले आहेत. पत्ते खेळताना पालथ्याच पानांवर बोली लावण्याला शुध्द जुगार म्हणता येईल. पण बोली लावून पाने व्यक्त करणाऱ्या आणि पार्टनरची पाने उलथी करणाऱ्या ब्रिजला जवळजवळ बुध्दीबळाचा दर्जा दिला जातो. तद्वतच जनुकांतर-धुमाकुळ ते काटेकोर जनुक अभियांत्रिकी, असा आंधळेपणाकडून डोळसपणाकडे जाणारा सलगपट कल्पिता येतो.

शेतीचा शोध लागल्यापासून आजपावेतो आपण निवडक लागवड (तण काढणे) आणि संकर या मार्गाने अप्रत्यक्षपणे जनुक-अभियांत्रिकीच करत आलेलो आहोत. वनस्पतीतील वधूवरांच्या जोड्या जमवून लाभप्रद संतती होईपर्यंत आपण प्रयोग करत असू व करीत आहोतही. कोणत्याही एका पेशीपासून संपूर्ण जीव निर्मिणे म्हणजेच टिश्युकल्चर हे नवे असले तरी त्याबाबत कोणी जी.एम म्हणून धसका घेत नाही.

संकरात आणि टिश्युकल्चरमध्ये आपणही पालथ्या पानांचा जुगारच खेळत होतो व आहोत. त्यात झालेली जनुकांतरे वाया जाणारी आणि धोक्याचीही असत कारण डाव आंधळा असे. आज कळीचा फरक असा पडला आहे की आता आपण पाने उलथी करून वाचू शकतो आहोत. कारण जनुकांचे कूट रेणू रेणू पर्यंत उकललेले आहे. असे असूनही आंधळ्या जुगाराला, मग तो नैसर्गिक असो वा मानवी, निर्धोक समजणे आणि डोळसपणे उलथी पाने बघून लावून घेण्याला मात्र प्रलयंकारी समजणे, हा उफराटा धसका का पसरला आहे?

मुख्य कारण एवढेच आहे की कृषिजीवाणूचा प्लाज्मॉइड नामक भाग आपल्या हाती लागला आहे. हा प्लाज्मॉइड कृषिजीवाणूतून बाहेर पडून भक्ष्य-वनस्पतीच्या यजमान पेशीत घुसतो. तेथील जनुक-मालेतला लचका तोडू शकतो व दुसऱ्याच जनुक-मालेतील मोकळ्या जागी जोडूही शकतो.

वनस्पतींच्या जनुक-मालेत दोरा(निरर्थक रेणू) भरपूर लांब पण माळलेली फुले(जनुके) मात्र विरळाच अशी स्थिती असते. प्लाज्मॉइड आता मानवी देखरेखीखाली व नियंत्रणानिशी या कामी जुंपला गेला आहे व यालाच विशेषत्वाने जनुक-अभियांत्रिकी म्हणतात. भय इतकेच आहे की त्यातील तोडणारा घटक जर सुधारित बियाणात व त्याच्या अन्नवापरातून मानवी शरीरात शिरला तर तो मानवी जनुक-मालेची मोडतोड करणार नाही कशावरून?

तोडणारा तुटतो जोडणारा जुडतो
मुळात प्लाज्मॉइड कृषिजीवाणूच्या आज्ञेनुसार काम करत असतो. प्लाज्मॉइडचे यशापयश आणि भक्ष्यजीवावर होणारे शुभाशुभ परिणाम यादृच्छिक असतात.

जनुक-अभियांत्रिकीद्वारे एन्झाइम्स व औषधे मनुष्य निवडकपणे, अपेक्षित सद्गुणाचे जनुक वेगळ्याच प्रजातीच्या पेशीतून तोडून आणायला प्लाज्मॉइडला भाग पाडतो. नंतर तोडण्याचा घटक निकामी करून, उरलेला अर्धवट प्लाज्मॉइड, जे बियाण सुधारित करावयाचे असेल त्याच्या पेशीत ढकलून देतो. आता या प्लाज्मॉइडकडे तोडण्याची शक्तीच उरलेली नसते पण कोणत्याही जनुक-मालेत जाऊन चिकटण्याची शक्ती मात्र असते. मोकळ्या जागेत चिकटून तो नव्या यजमान पेशीला नवे जनुक प्रदान करतो. यात मानवाचे इप्सित साध्य होते. जसे की कापसाला बोंडअळीशी प्रतिकारशक्ती प्राप्त होते, केळ्याला स्वतःत लोह धारण करण्याची क्षमता प्राप्त होते तर सोयाबीनला तांबेरा या रोगापासून बचाव करता येऊ लागतो, इत्यादि.

सुधारित बियाणाच्या जनुक-मालेत चिकटलेला, अर्धा प्लाज्मॉइड आता कृषिजीवाणूतला स्वतंत्र प्लाज्मॉइड उरलेलाच नसतो. त्याला इतस्ततः भटकण्याची मुभा आता नव्या यजमानपेशीत उरलेलीच नसते. तो आता प्लाज्मॉइडच नसतो. मग तो यानंतर कोणाच्याच म्हणजे पिकाच्या किंवा माणसाच्या जनुक-मालेवर आक्रमण कसे करणार?

तरीही आता मुद्दाम एक भयंकर शक्यता पाहू. समजा तोडणारा घटक उरलाच तर काय होईल? सुधारित करावयाच्या नव्या यजमान पेशीत तो धुमाकूळ घालेल व तिचे मूळ गुणधर्मसुध्दा ध्वस्त करेल. अशी विकृतीग्रस्त पेशी असल्याचे बियाण बनविण्यापूर्वीच ध्यानात येऊन तिचा पुढील वापर टाळतात. याशिवाय साखळीप्रक्रिया घडू नये यासाठीच, पीक हेच बियाण म्हणून वापरता येणार नाही असा, टर्मिनेटर जोडलेला असतो.

अशा सर्व सेफगार्ड्समुळे मानवी जनुक-मालेवर आक्रमण करेल असा घटक अन्नातून आत जाणे अशक्य आहे. टर्मिनेटरविषयी, पुनःपुन्हा रॉयल्टी मिळावी या आर्थिक लोभापायी तो टाकतात हा गैरसमज आहे. उत्पादनखर्चात रॉयल्टी नगण्य असते. तसेच ‘टर्मिनेटरचे वंध्यत्व’ सर्वच वनस्पतीत पसरेल(!) हे हास्यास्पद आहे.

तरीसुध्दा पुरेश्या चाचण्या घेतल्याशिवाय व सरकारी तज्ञसमितीने पास केल्याशिवाय कोणतेही बियाण विक्रीसाठी खुले करता कामा नयेच. येथे तर मोठाच दैवदुर्विलास भारताच्या पदरी आला आहे. निसर्ग हा जणू अहिंसकच असतो (तो तसा अजिबातच नसतो) मानवच काय तो हिंसक असतो अशी कविकल्पना मानणाऱ्यांनी व पश्चिमद्वेष्ट्या प्रतिगाम्यांनी चाचण्यांवर बंदी आणवली आहे. प्रत्यक्ष वापरावर मात्र बंदी नाही! कापसाबाबत अटलजींनी अधिकृत परवानगी दिली व ती लागूही आहे. सर्व कापूस बीटीच आहे. आत्महत्या बीटीमुळे नव्हे तर एकाधिकार खरेदी योजनेमुळे झाल्या. आता महाराष्ट्रातली एकाधिकार खरेदीही रद्द झाली आहे आणि कापूस क्षेत्रात विक्रमी वाढ झालेली आहे.

जनुक-अभियांत्रिकीमध्ये क्रांतिकारक शक्ती दडलेली आहे. कमी पाण्यानिशी तगणाऱ्या, खार जमिनीत तगणाऱ्या जाती, जास्त उत्पादकता आणि जास्त पोषणमूल्य देणाऱ्या जाती, भारतीय कृषिविद्यापीठांनी शोधलेल्या आहेत. पण त्यांना त्या वापरता येत नाहीयेत. शेतकऱ्यांना नुसत्या भरपाया देत रहायचे की कायमस्वरूपी आर्थिक सक्षमता द्यायची हा खरा प्रश्न आहे.. शेतकरी, ग्राहक आणि संशोधक या तिघांचे स्वातंत्र्य हे खोट्या भयापायी कुचंबविणे हा हट्ट ‘विकास’वादी सरकारला अजिबात शोभत नाही.  

  





Friday, August 7, 2015

टेक्नॉलॉजी म्हणजे काय रे भाऊ? (भाग-१)


सध्याच्या युगाला तंत्रयुग म्हटले जाते आणि ते रास्तच आहे. विविध तंत्रे कोणकोणते चमत्कार करून दाखवतात याची रसभरीत वर्णने बरीच वाचायला मिळतात. तर दुसरीकडे विज्ञानातील सिद्धांत किंवा वैज्ञानिक खुलासे क्वचित व तेही थोडक्यात वाचायला मिळतात. ज्या सूत्रांच्या योगे आपल्याला एकूण तंत्रविद्येसंबंधी एक दृष्टी प्राप्त होईल अशी काही सामान्य सूत्रे आहेत का? होय निश्चितपणे आहेत. इंजिनिअरिंगचे औपचारिक शिक्षणही जास्त समजेनिशी घेण्यासाठी ही सूत्रे उपयोगी पडतात. इतर क्षेत्रातील लोकांना देखील एकूण तंत्रक्षेत्रात काय काय चालते यावर एक सर्वसाधारण पकड येऊ शकते. निदान गूढनिवारण (डीमिस्टीफिकेशन) तरी होते. आपण तंत्रज्ञ नाही हा हीनगंडही दूर होतो व आपण तंत्रज्ञांशी न बिचकता बोलू शकतो.


यंत्र म्हणजे काय? अगदी सामान्य व्याख्या अशी की माणूस श्रम करताना   ज्या हालचाली करू शकतो, त्यांचे रूपांतर, वस्तूंमध्ये आपल्याला जे बदल घडवून आणायचे असतील, त्यासाठी लागणाऱ्या प्रक्रियांमध्ये करण्याची कोणतीही पद्धती म्हणजे यंत्र होय. उदा. पूर्वी आपण काठीने दोरीवर कपडे वाळत घालत होतो त्या ऐवजी आता दोरीच खाली येईल अशी व्यवस्था करता येते.

यंत्र हा तंत्राचा एक प्रकार झाला. जे शक्य नव्हते ते शक्य करण्यासाठी कोणतीही उपलब्ध प्रक्रिया वापरणे वा नवी शोधणे म्हणजे तंत्र होय.
सर्वच तंत्रांचे उद्दिष्ट मनुष्याला अधिकाधिक विकल्प मोकळे करणे हे असते. अन्न शिजवता आल्याने अन्नाचे ऑप्शन्स बरेच वाढले. भाल्याने शिकार करता आल्याने भक्ष्य ठरू शकणारे प्राणीही वाढले. साठवण करता येण्याने आणखी वाव वाढला.   
माणसाच्या शरीरातून उपलब्ध होणारी ऊर्जा ही श्रमात लागतेच पण जसा बाहेरील वस्तूंना माणूस आपल्या कामासाठी जुंपतो तसाच तो बाह्य ऊर्जांनाही जुंपतो. हात-साधन(टूल), यंत्र-साधन(मशीन) आणि उर्जित-यंत्र-साधन(पॉवर्ड मशीन) व असे करत स्वयंचलित-यंत्र-साधन (ऑटोमेशन) ही साधनांच्या प्रगतीची एक धारा आहे. विविध साधने बनविताना काही सामान्य सूत्रेही वापरली गेली आहेत.

तरफ - आपल्याला जोर कमी लावून हालचाल जास्त करता येईल की थोड्या हालचालीत जास्त जोर लावता येईल याची निवड करावी लागते. पहारीने धोंडा सरकवण्यात हाताचा जोर कमी तर धोंड्यावरील जोर जास्त असतो. उलट वल्ह्यामध्ये हाताची हालचाल कमी पण पाण्यातील हालचाल जास्त असे करून मिळते. तरफ किंवा तरफ-सदृश इतर गोष्टीमुळे जोर/हालचाल गुणोत्तर बदलून मिळते. तरफ-सूत्र हे कप्प्या (पुलीज), गिअरबॉक्स, पास्कलचे दाबयंत्र, ट्रान्सफॉर्मर(करंट/व्होल्टेज), पंप असे अनेक रूपात आढळते.

झडप(व्हॉल्व्ह) - प्रवाह किंवा हालचाल एका दिशेने होऊ द्यायची मात्र उलट दिशेने होता कामा नये अशा कोणत्याही रचनेत झडप- दिसते. विविध प्रकारचे सापळे (उदा. उंदराचा पिंजरा) हे झडपसूत्रानेच रचले जातात. हवा भरण्याचा हातपंप. इंजिने कॉम्प्रेसर अशा किंवा विद्यत उपकरणातही व्होल्व्ह लागतात. इतकेच काय पण मिठागर ही सुध्दा झडप आहे. भरतीचे पाणी त्यात येते पण परत जाऊ शकत नाही.

शिड(अम्प्लिफायर) - शिडे फुलवणे किंवा मिटवणे याला फार कमी ऊर्जा लागते. परंतु याच क्रियेद्वारे, शिडाने पवनऊर्जा झेलून ती जहाजाला ढकलण्यात ,किती व कधी कामी आणायची, याचे नियंत्रण नाविकांच्या हातात येते. एका छोट्या उर्जेने दुसऱ्या मोठ्या ऊर्जेला नियंत्रित करता येते हा फार मोलाचा शोध आहे. अंकुश आणि हत्ती, कळप हाकणे, फिल्म-प्रोजेक्टर, फ्लेम-कटर, दुर्बीण, सूक्ष्मदर्शक, यात अम्प्लिफिकेशन हे तत्त्व वापरलेले असते. याउलट मोठ्यापासून छोटे, म्हणजे सर्किट ड्रॉइंगपासून मायक्रोचिप असे, उलट दिशेनेही हे उपयोगी पडते.   

मर्यादित-प्रवेश(सिलेक्टिव्ह-परमिशन)- सुगरणीचे घरटे, जनावरे न जाऊ शकणारे आडवळणी दार, गाळणे, चाळणी, गॉंगल, फिल्टर, गो/नोगो गेजेस, ग्लासट्रॅप, रिव्हर्स ऑंस्मॉसिस, पोलरायझ्ड लेन्स, कुलूप-किल्ली,
पासवर्ड/बायोमेट्री असे अनेक आविष्कार पहायला मिळतात.

गुंतवून/ चिकटवून/वितळवून बांधणी (फासनिंग)- गांठी मारता येणे, अडकणारे पण काढता येणारे भाग, सांधेजोड, नटबोल्ट, रीव्हेट, डिंक, चुनालेप, सिमेंट, वेल्डिंग इत्यादी

प्रती काढण्याचे (कॉपीइंग)- एका दाण्याचे कणीस होते हे शेतीत तर दिसतेच पण एकदाच बनविलेली गोष्ट परत परत बनविताना तिचा साचा किंवा छापा वापरणे हे मानवाने शोधलेले खास तंत्र आहे. स्टेनसिल,
रोलर-रांगोळी, गठ्ठ्याने एकदम कटिंग करणे, दाबाखाली साच्यात पत्रा दाबणे, ओतकाम आणि अर्थातच छपाई, झेरोक्स ते पेन-ड्राइव्ह, रेकोर्ड-प्लेअर, कसेट, सीडी इत्यादी

उर्जेची रुपांतरे (एनर्जी-कन्व्हर्शन)- प्राणीज, स्थैतिक-गुरुत्व-ऊर्जा, जल, पवन, रासायनिक, ज्वलननिर्मित, औष्णिक, यांत्रिक-बल-कार्य, प्रकाश, विद्युत, आण्विक अशा विविध ऊर्जारूपांचे एकमेकीत, उपलब्ध ऊर्जेचे उपयुक्त ऊर्जेत रूपांतर करून वापर

ऊर्जेवर चालनादेश स्वार(सिग्नल-कमांड) पुरेसा थंड झाल्यानंतर फ्रीजचा  कोम्प्रेसर बंद व्हावा यासाठी वापरला जाणारा थर्मोस्टॅट, टीव्हीचा रिमोट, व्यक्ती जवळ येताच उघडणारा व नंतर आपोआप बंद होणारा दरवाजा/एस्कलेटर असो वा रडार असो या सर्वात आकृतिबंध किंवा घटनाक्रम छोट्याशा ऊर्जेत कोरला जातो. व यंत्रातील कळसूत्र प्रचालित केले जाते.  

मापन व गुणनिर्देश(इंडीकेशन अँड मेझरमेंट) - कोणत्या रंगाचा साका(प्रेसिपिटेट) जमला आहे यावरून रसायन ओळखणे, तारेवरील रायडर उडल्यावर कंप्रता जुळल्याचे ओळखणे यात मापन नसले तरी निर्णायक घटना असते. सलगपणे बदलणारे तापमान पाऱ्याच्या लांबीशी निगडीत करून मापन करणे हे थर्मोमीटरमध्ये साधलेले असते. याचप्रमाणे व्होल्टमीटर, विजेचा मीटर, पाण्याचा मीटर इ. उदाहरणे देता येतील.

प्रतिसंदेश(फीडबॅक) - ड्रायव्हर एसटी फलाटाला लावत असताना कंडक्टर शिट्या मारून त्याला फीडबॅकच देत असतो.  थेटपणे कामच होईल असा फीडबॅक म्हणजे उदाहरणार्थ टाकीत पाणी पुरेसे भरले की बॉल उचलला जाऊन नळ बंद होतो. आऊटपुट बघत बघत इनपुट योग्य दिशेने बदलणे ही क्रिया सर्वच तंत्रांत आवश्यक असते.

नव्या गुणांची द्रव्ये(मटेरीयल्स विथ नॉव्हेल प्रॉपर्टीज)- रासायनिक, रेण्विक व इतर क्रियांनी नवनवीन गुणधर्मांची द्रव्ये उपलब्ध होणे हे या सगळ्यासाठी अत्यंत आवश्यक असते. द्रव्यात नवी भर पडली की बरेच नवे मार्ग उपलब्ध होत असतात. न गंजणारे लोखंड (स्टेनलेस स्टील), प्लास्टिक, थर्माकोल इ  

मानकीकरण(स्टँडर्डायझेशन) -कोणताही सुटा भाग हा कोणत्याही असेम्ब्लीत फिट बसला पाहिजे. म्हणून कंपनीनिहाय वेगळाली मापे असून चालत नाही. यासाठी मानके ठरविलेली असतात. नट आणि बोल्ट, फायली आणि पंच केलेल्या दोन भोकातील अंतर, कॅसेट, सीडी व त्यांचे प्लेयर इ.


आकृती-आलेख-नोंद्णूक(रेकोर्ड ऑफ डायग्राम अँड ग्राफिक्स) - तंत्र उपलब्ध असणे म्हणजे ते व्यक्तीगत कौशल्यावर किंवा विशेष संवेदनशीलतेवर अवलंबून नसणे व ते हस्तांतरित करता येणे होय. यासाठी मापे, निरीक्षणे, ड्रॉइंग इ. अचूक नोंदवून ठेवणे तसेच कार्यपद्धती नोंदवून ठेवणे हे आधुनिक तंत्रज्ञानाचे खास वैशिष्ट्य आहे. या यादीत भरही घालता येईल.  

टेक्नॉलॉजी म्हणजे काय रे भाऊ? (भाग-२)



विविध व विरोधी अपेक्षांची इष्टतम पूर्ती ओळखणे
(ऑप्टिमायझेशन ऑफ कॉंपिटिंग कन्सिडरेशन्स)

तंत्रज्ञांची खरी कसोटी या मुद्द्यावर लागते. सर्वगुणसंपन्न असे उत्पादन कधीच करता येत नाही. कोणते गुण कितपत अपेक्षायचे हा प्रश्न विज्ञानबाह्य असतो. तो नेहमीच मूल्यात्मक असतो. दुर्दैवाने विज्ञान शिकवले जाते पण इष्टतमीकरण शिकवले जात नाही. प्रत्यक्षात मात्र मुख्यतः तेच करावे लागते!

उदा. इमारतीबाबत ती न पडणे ही किमान अपेक्षा झाली, सरावाने कामगारसुध्दा न पडेल अशी इमारत बांधू शकतील. खरा प्रश्न असतो तो मटेरियल कॉस्ट कमीत कमी ठेवण्याचा. म्हणजेच सेफ्टीXकमी मटेरियल असे एक द्वंद्व उभे रहाते.
घाऊक उत्पादनातील एक महत्त्वाचे द्वंद्व म्हणजे लागेल तसतसे उत्पादन करायचे की पुरवठा अखंडीत राखण्यासाठी विविध स्टेजेसना भरपूर बफर स्टॉक राखायचे? स्टॉक वाढवले तर खेळत्या भांडवलावरील व्याजात मार खावा लागतो. हातातोंडाची गाठ राखली तर कुठेही काही कमी पडले तर सगळेच उत्पादन थांबते व सगळीच साधने पडीक राहून शिवाय ऑर्डरही हातची जाऊ शकते. रिलायेबिलिटीXरिडन्डन्सी हे न सुटणारे द्वंद्व असते. काही रिडन्डन्सी अपरिहार्य असते.

जास्त क्षमतेचे संयंत्र जर कमी क्षमतेनिशी वापरले तर त्याची ऊर्जाबचत घटते. पण नजीकच्या भविष्यात जास्त क्षमता लागलीच तर नवे संयंत्र बदलण्यात होणारा खर्चाचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो. 

कमाल ऊर्जा X सरासरी ऊर्जा हे एक मोठे द्वंद्व आहे.
यंत्राची उत्पादकता आणि यंत्राची वैविध्यपूर्ण उत्पादनक्षमता हेही द्वंद्वच असते. श्रमखर्चXभांडवली खर्च, टिकाऊपणाXस्वस्तपणा, घाऊकताXव्यक्तीसुयोग्यता, शिस्तXलवचिकता, स्वावलंबित्वXयत्नभार, बहुविध-कार्यXविक्षेप(बोदरेशन्स), दीर्घगामी फायदा Xऱ्हस्वगामी फायदा, कवायतXप्रसंगावधान, नफ्याचे मार्जिनXग्राहकविस्तार अशी द्वंद्वे उत्पादकाला असतात व ती पर्यायाने तंत्रज्ञालाही अप्रत्यक्षपणे पेलावी लागतात.

योग्य काय आहे आणि उपलब्ध काय आहे हे दोन्ही पाहूनच उपलब्धातले सर्वाधिक योग्य निवडायचे असते. सुवर्णमध्य हा शब्द जरी छान असला तरी सुवर्णमध्य हा मधोमधच सापडेल असे क्वचितच घडते. गणिताने कितीही  अचूक उत्तर आले असे तरी बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तूंपैकी जी उत्तराच्या जवळ जाईल ती निवडावी लागते.

त्याहूनही मोठा घोळ असा की आपण अपेक्षांची द्वंद्वे जरी एका नंतर एक अशी लक्षात घेतली तरी ती लागू असतात एकसमयावच्छेदेकरून!

इष्टतमीकरण(ऑप्टिमायझेशन) हे काही अंशी गणिताने तर काही अंशी इतर निकषांनी ठरवावे लागते. गणितातही वर्गसमीकरणाला दोन उत्तरे असतात. उदाहरणार्थ तेवढ्याच दारूगोळ्यानिशी तोफेचा मारा तटावर वा तटावरून पलीकडे अशा मार्गांचा उपयोग करता येतो. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हे व्यक्त करण्यासाठी कृत्रिमरित्या गुणांक धरावे लागतात. हे सगळे विज्ञानबाह्य आहे मानव्यशाखांतले आहे. दोन्हीतील आंतरसंबंध हे दोन्हीकडे शिकवले जात नाहीत.

नवमार्गशोधन: प्रतिभा आणि रीतीची काही सूत्रे  
इन्होवेशन्स केली पाहिजेत असे राष्ट्राला उद्देशून भाषण काय कोणीही करेल. पण कशी? काही मार्गदर्शक सूत्रे नक्कीच सांगता येतात. नवा मार्ग शोधण्याची वेळ केव्हा येते? जेव्हा धरलं तर चावतं अन् सोडलं तर पळतं अशा छापाची दुविधा, पेचप्रसंग किंवा शृंगापत्ती (डायलेमा) उभी ठाकते तेव्हा. ही दुविधा नेमकी काय आहे हे जर अचूक मांडता आले तर तिच्यातून बाहेर पडण्यासाठी कोणते रिसोर्सेस आहेत याकडे लक्ष जाऊ शकते.

फुटपाथवरील कचराकुंडी ही उंच असली पाहिजे कारण जास्त कचरा मावून खेपा वाचल्या पाहिजेत. पण उंच कचराकुंडीत कचरा टाकणे अवघड गेल्याने कचरा कुंडीच्या बाहेरच पडू लागतो. टाकायला सोपे जावे म्हणून ती बुटकीही हवी. उंच की बुटकी ही दुविधा आहे. मावणे ही गोष्ट घडण्यासाठी उंच ऐवजी खोलही चालेल. यासाठी कुंडी फिट बसेल असा खड्डा करतात व त्यातूनच कुंडी ठेवणे व नेणे करतात. यात कुंडी खालचा अवकाश हा नवा रिसोर्स सापडला आहे.

आपल्याला शत्रू दिसला पाहिजे पण आपले डोळे त्याच्या माऱ्याच्या कक्षेत येता कामा नयेत या दुविधेतून पेरीस्कोप सापडला. आख्खा हाय वे रात्रभर प्रकाशमान ठेवणे खर्चिक आहे. वाहनाला जो अडथळा दिसण्याची गरज असेल तो समोर आला की अचानक दिवे लागतील हे करणेही अवघड आहे. वाहनाच्याच दिव्यांचा वापर करून रस्त्यावरचे (व वाहनांवरचे) रिफ्लेक्टर्स ही युक्ती सापडते.

एका दगडात दोन पक्षी - चिमणी म्हणजे उंच धुराडे बांधतात. त्यात दोन उद्दिष्टे साध्य होत असतात. धूर जितका उंचावर सोडावा तितके त्याचे विरलीकरण होऊन प्रदूषण कमी होते हे एक उद्दिष्ट असतेच. चिमणी म्हणजे गरम हवेचा एक स्तंभ बनतो. त्या हवेचा दाब बाहेरील हवेपेक्षा कमी राहतो. यामुळे भट्टीत ताजी हवा जोराने खेचली जाऊन ज्वलनाची कार्यक्षमता वाढते. लोहाराचा भाता किंवा कल्हईवाल्याचा पंप हेच काम करतो.

बॉक्स-फाईल मध्ये पाने उलटता येतात पण ती जागा जास्त व्यापते. साध्या फाईलने जागा कमी व्यापली तरी पाने उलटता येत नाहीत. स्प्रिंग-फाईल या प्रकारात दोन्ही साधलेले असते. दोन किंवा अधिक फायदे एकाच नव्या मार्गाने मिळवणे असे हे सूत्र आहे.   

उलट्या बाजूने पहा हेही एक सूत्र आहे. एडिसन जोवर न जळणारे फिलॅमेंट शोधत होता तोपर्यंत त्याला बल्ब बनविणे जमले नाही. अगणित प्रयोग वाया गेले. जेव्हा एडिसनने आपला बघण्याचा मोहरा, जळणाऱ्या घटकाऐवजी जाळणाऱ्या म्हणजेच ऑक्सीजनकडे वळवला, तेव्हा त्याला ऑक्सिजनचा अभाव ही युक्ती सुचली व निर्वात बल्ब सापडला. 

छोट्याशा बाटलीच्या आकाराचे लिकरने भरलेले चॉकोलेट असे एक उत्पादन असते. चॉकोलेटच्या द्रव्याचे बाटलीच्या आकारात ओतकाम करताना आत पोकळी कशाने राखायची? आणि ही आतली पोकळी राखणारी कोअर काढताना बाटली तुटेल त्याचे काय? या प्रश्नावर कोअरच फ्रोझन लिकरची बनविणे हा अफलातून मार्ग सापडला. फ्रोझन लिकरची कोअर गरम चॉकोलेटात बुचकळून काढली की बाहेरून चोकोलेटची बाटली बनते. हे घडताना फ्रोझन लिकर वितळतेही  आणि द्रव चॉकोलेट घनही बनते.  
प्रतिकूल घटकालाच अनुकूल दिशेने वळवायचे. 
रायफल रिकॉईलचा फटका सैनिकाला न बसावा म्हणून फटक्यातली उर्जा काढून घ्यायची आणि नवी गोळी चार्ज करण्यासाठी ऊर्जाही पुरवावी या दोन गरजा एकमेकीना पूरक बनविण्यातून ओटो चार्जिंग रायफल मशीन-गन सापडते. 
लॉन-मॉवरचा एक एक्झॉस्ट गवतात वळवतात, ओले गवत अडकत नाही व गोंगाटही (गवताने अब्सोर्प केल्याने) कमी होतो. 
चॅटरिंग म्हणजे धड चालूही नाही व धड बंदही नाही अशा स्थतीत स्वीच सापडणे हे एरवी चुकीचे असते. पण हेच  टर्रर्र आवाजाच्या बेलमध्ये व ट्युबच्या चोक मध्ये उपयुक्त ठरते. 
घर्षण ही तोट्याची गोष्ट पण ब्रेक लावताना, शॉक-अब्सोर्बरमध्ये धक्क्याची ऊर्जा घर्षणात व्यतीत करताना व तेच डोअर क्लोजर दाणकन आपटू नये म्हणून ओईल आणि दट्ट्या ही रचना व्हिस्कस-फ्रिक्शनमुळे उपयोगी पडते. 
यंत्राचे स्वतःचे वजन हे अगडबंब होता कामा नये हे सामन्यतः खरे असले तरी फोर्क-लिफ्ट, क्रेन, ट्रॅक्टर हे उलटू नयेत म्हणून जड बनविणे फायद्याचेच ठरते. विद्युतचुंबकाच्या लोखंडात एडी करंट तयार होणे हा अपव्यय असतो पण इन्डक्शन हीटिंगमध्ये तेच उपकारक ठरते. धरणाचा एक उपयोग

काम अंशतः अगोदरच करून ठेवणे- जो कागद नेमक्या जागी फाडायचा असेल त्याला  परफोरेशन करून ठेवणे, लाकडातून धूर फार येतो म्हणून त्याचा अगोदरच कोळसा करून ठेवणे  चॉकलेटच्या वड्या पडतील अशा खाचा करून ठेवणे. अशा गोष्टी यात मोडतात.

अडथळा उभारून ठेवणे: वणवा पसरून सारेच जंगल जळेल. हे वाचविण्यासाठी वणवा अजून पोहोचलेला नाही अशा ठिकाणी मुद्दाम जंगलाची एक पट्टी जाळून सीमारेषा बनवून ठेवतात. वणव्याला खाद्य मिळण्याचे थांबते व तो या पट्टीच्या अलीकडेच रोखला जातो.  

संकट समोरून पेलण्यापेक्षा ते बायपास करणे- लाईटनिंग अरेस्टर हा पडलेली वीज स्वतःकडे आकृष्ट करतो आणि इमारतीत न जाऊ देता जमिनीत पोहोचवितो

अशा सूत्रांना स्ट्रॅटेजीज म्हणतात. अशा ४० स्ट्रॅटेजीज, तसेच कोणत्या घटका बाबत अडचण उभी राहिली आहे असे ४० घटक यांचे मोठ्ठे मॅट्रिक्स जिज्ञासूंनी TRIZ या साईटवर पहावे हा रशियन शोर्टफॉर्म असला तरी साईट इंग्लिशच आहे. त्यावर पुस्तकेही आहेत. मुख्य म्हणजे कोणत्याही इंजिनीअरिंग सिलॅबसमध्ये हे मिळत नाही!


दुर्गुण मानवी आणि आरोप ईश्वरावर?


मानवी भावविश्वात ईश्वराचे अस्तित्व आहे यात शंकाच नाही. पण मानवी-भावविश्वाच्या निरपेक्ष ईश्वराला स्वयंमात्र अस्तित्व आहे की नाही हे वादग्रस्त आहे.   
जेव्हा रामायणातल्या उर्मिलेवर अन्याय झाला असे आपण म्हणतो तेव्हा उर्मिला आणि तिची स्थिती या गोष्टी पुराव्याने शाबित झालेली तथ्ये आहेत, असे आपल्याला म्हणायचे नसते. 

उर्मिलेच्या निमित्ताने स्त्रीवर होऊ शकणारे अन्याय काय काय असू शकतात याची नोंद घेणे आणि तसे अन्याय न करण्याची वा न होऊ देण्याची जबाबदारी अस्फूटपणे मान्य करणे हे वाङ्मयीन कृत्य आपण करत असतो. आपल्या दृष्टीकोनात झालेला हा बदल उर्मिलेच्या स्वयंमात्र अस्तित्वावर जरा सुध्दा अवलंबून नसतो. 

भगीरथाने गंगा वळवून भारतात आणली हे वस्तु-तथ्य असले किंवा नसले तरी स्तुत्य आणि श्रेयपूर्ण आहे की नाही? नक्कीच श्रेयपूर्ण आहे. गुणावगुण कशाला मानायचे हे ठरवीत असताना आपण जी काही पात्रे निर्मितो त्यांच्यात जे काय दोष असतील ते असतील पण अस्तित्वात नसणे या नावाचा दोष नसतो. पण पात्रांवर अन्याय होऊ शकतो. म्हणजेच ईश्वर जरी नसला तरी त्याच्यावर अन्याय होऊ शकतो. नव्हे झालेलाच आहे.

तत्त्वज्ञानात अस्तित्वात असणे हा गुण मानता येत नाही हे मान्य झालेले आहे. ईश्वर अस्तित्वात आहे हे सिद्ध करण्यासाठी देकार्त ने जो युक्तीवाद मांडला तो गमतीशीर आहे. देकार्त म्हणतो, सर्व सकारात्मक गुणांत परिपूर्ण अशी गोष्ट ही कल्पना आहे. जिच्यात इतके सगळे गुण आहेत तिच्यात साधा अस्तित्वात असणे प्राथमिक गुण नसेल हे कसे शक्य आहे. म्हणून तशी गोष्ट अस्तित्वात आहे आणि तिला आम्ही ईश्वर म्हणतो हा युक्तीवाद फसवा आहे. 

जे सिद्ध करायचे तेच सुप्तपणे गृहीत धरण्याचा हा प्रकार आहे. या युक्तिवादाचे खंडन असे होते. अस्तित्वात असणे हा गुण असू शकतो काय? जर तो गुण असेल तर त्याचा गुणी (गुणधारक) अस्तित्वात असेल की नसेल. गुणधारक जर अस्तित्वात असेल तर देकार्त फक्त द्विरुक्ती करीत आहे. याउलट गुणधारक जर अस्तित्वात नसेल तर देकार्त व्याघात करीत आहे. म्हणून अस्तित्वात असणे या नावाचा वेगळा गुण मानणे चूक आहे.

असणे हा जसा गुण नाही तसाच नसणे हासुध्दा दोष नाही! ईश्वर जर अस्तित्वात नसेल तर अस्तित्वात नसणे हा काही त्याचा दोष ठरत नाही. जे ईश्वराचे अस्तित्व मानतच नाहीत ते ईश्वराला दोष चिकटवीतही नाहीत. कारण ते कोणाला दोष चिकटवणार?

परंतू जे ईश्वराचे अस्तित्व मानतात ते ईश्वराचे गुणगान करण्याच्या भरात आणि/किंवा त्यांच्या इतर मतांमुळे ईश्वरावर भलतेसलते दोष आरोपित करू शकतात. किंबहुना त्यांनी तसे केलेलेच आहेत. याची कितीही उदाहरणे सापडू शकतात.

एखाद्या वृतीने अधम असलेल्या माणसाला, केवळ त्याने कठोर तप(स्वपीडन) केले या श्रेयाखातर वरदान म्हणून विध्वंसक शक्ती बहाल करणे हे आपल्याच प्रजेचा घात करणे नव्हे काय? असे मूर्खपणे शंकराच्या नावावर पडलेले आहेत. विष्णूने ते निस्तरायचे हा नसता उद्योग विष्णूला तरी का करायला लावावा?

विष्णूने स्वतः निरनिराळ्या अवतारात, भंपक पित्याच्या आज्ञेखातर निष्पाप मातेचा शिरच्छेद करणे. हीन कुळातला माणूस फार पुण्यवान ठरू लागला आणि इंद्राचे आसन डळमळू लागले की त्या पुण्यवानाला डोक्यावर पाय देऊन गाडून टाकणे. दुसरीकडे तप हेच पाप मानून वध करणे. आपल्या भावी मित्राच्या बाजूने, तो मित्र आणि त्याचा शत्रू यांचे द्वंद्वयुध्द चालू असताना झाडाआडून बाण मारून, मित्राच्या शत्रूला मारून टाकणे असे अनेक अपराध नोंदवले गेले आहेत. हे हिंदू धर्मातले आहे पण हिंदू म्हणून निवडकपणे निंदा करणे हेही बरोबर नाही.

इतर धर्मातल्या ईश्वरांबाबत त्यांना भक्तांनीच भलतेसलते आरोप चिकटविण्याचे प्रकार आणखीच भयंकर आहेत. निष्ठा असेल तर इतर गुन्हे माफ आणि निष्ठा नसेल तर थेट नरकच! स्वर्गसुखाच्या आणि नरकयातनांच्या कल्पना सुध्दा अत्यंत हीन अभिरुचीच्या. इतरांनी सांगितलेले ईश्वर मानले तर तुम्ही नरकात तर जाणारच पण पृथ्वीवरसुध्दा एकमेव ईश्वराचे बंदे तुम्हाला जिवंत राहू देणार नाहीत. असा क्रूर हुकुमशहा म्हणून ईश्वराचे चित्र रंगवणे हे ईश्वरवाद्यांना कसे शोभते?

ग्रांथिक धर्मांतले स्वर्ग नरक असोत किंवा हिंदू, जैन, बौध्द धर्मांतले पुनर्जन्म असोत. सुभाग्य किंवा स्वर्ग हे पूर्वजन्मीच्या सत्कृत्याबद्दल तसेच दुर्भाग्य किंवा नरक हे पूर्वजन्मीच्या दुष्कृत्याबद्दल ही जर ईश्वरी योजना असती तर त्याने त्या त्या कृत्यांचे स्मरण व्हावे ही सोय ठेवली नसती काय? स्मरणाशिवाय धडा शिकवणे याला अर्थच रहात नाही.

पण मुद्दा याहूनही सखोल आहे. भये किंवा प्रलोभने दाखवून माणसे बाह्य वर्तनात जास्त मॅनेजिबल होतीलही पण ती आतून व स्वयंध्यासाने सदाचारी कशी होतील? कारण धमकी खातर वा प्रलोभना खातर केलेले वर्तन हे स्वतःला भल्याबुऱ्याची उमज पडून केलेले नसते. मला बदल्यात काय मिळते याच्या निरपेक्ष मी श्रेयनिष्ठ होत नाही तोवर चांगल्या ईश्वराला त्याचा प्रकल्प पुढे गेलाय असे समाधान मिळणेच शक्य नाही. त्याला निरपेक्षपणे सद्वृत्त (त्याच्यासारखे पण स्वतंत्र) जीव बनवायचे आहेत ही त्याची महान तळमळ दुर्लक्षित करून, आपण स्वर्ग/नरक/पुनर्जन्म यांद्वारे त्याला कसेही करून मॅनेज करणारा ठरवत नाही काय?

दुसरे असे की नरकयातनांमागील न्यायकल्पना ही प्रतिशोधाची कल्पना नाही काय? सूड म्हणजे न्याय हे अत्यंत घातक समीकरण असभ्य संस्कृतीत असेलही पण ईश्वराची न्याय कल्पनासुध्दा चक्क सूडाचीच असू शकेल? तसेच प्रलोभनांचेही आहे सोसल्याची भरपाई असो वा योगदान केल्याचा मोबदला असो! कशाच्याही बदल्यात काहीही चालते ही तद्दन बाजारू वृती नव्हे काय?

माणसात ती आहेही पण ईश्वराच्या न्याय कल्पनेत उदाहरणार्थ जनहितासाठी झिजणाऱ्या महात्म्यांना भोग्य-सुखे पुरवणे हे त्या महात्म्यांना कसल्या प्रकारची माणसे ठरविणे आहे? संनिष्ठेला स्वयंभू मूल्य असते, तिच्यात अंगभूत आनंद असतो ही गोष्ट ईश्वराला सुध्दा कळू नये? हे कसे शक्य आहे?

असेच अकलेचे पण आहे. गर्भाशयातला थर पडून जाणे हे अपवित्र असते असे कुठल्यातरी काळच्या बिनडोक माणसांना वाटू शकते. पण एवढ्या साध्या गोष्टी ईश्वरालासुध्दा कळत नसतील?

ईश्वर माणसाला धमक्या आणि प्रलोभने देतो हे अशोभनीय आहेच पण माणसे ईश्वराला धमक्या आणि प्रलोभने देतात आणि तोही बिचारा अशा गोष्टीना भुलून वशिलेबाजी करतो हा आणखीच त्याला माणसापेक्षा हीन ठरविणारा आरोप आहे! नवस, बळी, खर्चिक शांत्या असली भंकस ईश्वराला चालेल?

सत्वपरीक्षा बघणे आणि त्यासाठी सदाचारी माणसांची कशीही दुर्दशा करणे, हा विकृत छंद आपण ईश्वराला का चिकटवतो आहोत? चमत्कारसुध्दा अभिरुचीचे दर्शन घडवितात. निष्ठा असेल तर स्वतःच्या मुलावर तलवार चालव अशी परीक्षा पहाताना चमत्काराने मुलाच्या जागी बकरी येते पण तलवारीच्या जागी उदा. मोरपीस आले असे का नाही होत?

दत्तजन्माच्या कथेत सती अनसूयेची दैवी शक्ती दिसते पण देवांची अभिरुची काय दिसते? हे कोणाला खटकत कसे नाही? आपण सद्बुद्धी दे अशी प्रार्थना करतो. म्हणजे दुर्बुद्धी देण्याचा ऑप्शन त्याला असतो की काय? दुर्बुद्धीही द्यायची आणि वर शिक्षाही द्यायची हा किती वाईट आरोप आहे त्याच्यावर?
अरेरे! हे प्रभो, आमच्यातल्या आस्तिकांनीच तुझी इतकी निंदा केली आहे की नास्तिकांना निंदा करण्याचा काही स्कोपच ठेवलेला नाही. नसलास तरी क्षमा कर आणि असलास तर तुझ्या स्वरूपाचे सोयीस्कर चिंतन आमच्याकडून न होवो, ही प्रार्थना