Friday, May 22, 2015

मर्मजिज्ञासा प्रश्नसंच - १ उत्तरे


१)          तीन पायाचे स्टूल एकवेळ कलंडेल पण कधीच डुगडुगणारनाही.
असे का व्हावे ?
अवकाशातील कोणतेही तीन बिंदू हे एका प्रतलात असतातच. हे अनिवार्य तथ्य आहे. (सत्य ला मूल्यात्मक अर्थ चिकटतात म्हणून तथ्य म्हणण्याची खबरदारी) चौथा बिंदूसुध्दा त्याच प्रतलात येऊ शकतो पण येतोच असे नाही. म्हणून चौथा बिंदूही त्याच प्रतलात येणे हे विशिष्ट घटित(कंटिंजंट) ठरते. स्टुलाच्या पायांची लांबी अचूकपणे समान नसू शकते. तसेच ठेवावयाची जमीनही किंचित उंचसखल असू शकते. ज्या क्षणी तिसरा पाय कोठेतरी टेकतो त्याक्षणी तीन बिंदूचे प्रतल निश्चित होऊन बसते मग ते जमिनीसमांतर नसेलही. हलण्याची मुभा उरत नाही व स्टूल डुगडुगत नाही. चौथा पाय असला की असे दोन त्रिकोण निर्माण होतात व ते समाईक कर्णाभोवती डुगडुगतात.

अनिवार्य(नेसेसरी) तथ्य आणि विशिष्टघटित(कंटिंजंट) तथ्य यात फरक करता येणे ही यातील मर्मदृष्टी आहे. प्रकाशकिरण सरळ रेषेत जातो हे सिद्ध करण्याच्या प्रयोगात मधोमध छिद्र असलेले तीन पुठ्ठे घेतात. तीनच का? दोन बिंदू सरळ रेषेत येणे हे अनिवार्य सत्य आहे तिसरा बिंदूही त्याच रेषेत येणे हे विशिष्टघटित सत्य जर आढळले तर प्रयोग यशस्वी होतो. प्रयोगात जो तथ्यप्रस्ताव(हायपोथेसिस) सिद्ध करायचा असेल तो जर खोटा ठरलाच तर कोणते निरीक्षण मिळेल हेही योजून ठेवलेले असावे लागते.
  
  २) जीवो जीवस्य जीवनंला अपवाद कोणता?


      उत्तर आहे वनस्पती! वनस्पती ह्या कर्बग्रहण करू शकत असल्याने त्यांना भक्ष्याची गरज लागत नाही. (याला काही कीटकभक्षक वनस्पती अपवाद आहेत) तसेच नत्रग्रहण करण्यासाठी परोपजीवी जंतूंची मदत लागते. भक्ष्य-भक्षक यांच्यातील पारस्परिक कुरघोड्यांच्या ओघात बऱ्याच उच्चतर क्षमता उत्क्रांत झाल्या हे विसरून चालणार नाही. तसेच जीवांमध्ये पूरक संबंधही असतात. तेव्हा ‘जीवेन जीवाय उज्जीवनम्’ असेही म्हणता येईल.

३)         रेडे मारले नाहीत किंवा मरू दिले नाहीत तर म्हशीचे दूध दुप्पट महाग होईल.  
मग अहिंसेचे काय?

रेडा हा (निदान महाराष्ट्रात तरी) बैलाप्रमाणे कामाला जुंपता येत नाही.  
बीजदाता म्हणून एखादाच रेडा पुरतो. जर रेडे मारले नाहीत किंवा मरू दिले नाहीत तर म्हशीच्या दुधाचा उत्पादनखर्च दुप्पट होईल. म्हणजेच आज ज्या दराने आपण दूध मिळवतो त्यापोटी आपला रेड्यांच्या हिंसेत अप्रत्यक्ष सहभाग असतो. दुग्धजन्य पदार्थही वर्ज्य मानणारे अहिंसावादी प्रत्यक्षात आहेत व त्यांना नुसते व्हेजिटेरियन न म्हणता व्हेगन असे म्हणतात.

गो-वंश पवित्र मानणाऱ्यांना गो-पित्यांचे खच्चीकरण कसे चालते? मुळात हे खच्चीकरण शेतीसाठी खरोखरच आवश्यक आहे की ती अंधश्रद्धा आहे? कारण टांग्याच्या किंवा रेसच्या घोड्याचे खच्चीकरण कुठे आवश्यक आहे?

कल्याण गंगवाल म्हणतात की वेदनेच्या लहरी निर्माण होतात व त्या भूकंप आणू शकतात. हे वादापुरते खरे मानले तरी असा प्रश्न येतो की समजा प्राण्यांना अगदी प्रसन्न वाटेल असा अनास्थेशिया दिला आणि मारून खाल्ले तर चालेल काय?

अहिंसेचा प्रश्न हा बराच घोटाळ्याचा आहे हेच खरे. 

४)         आपल्याला पाचच ग्रहणेंद्रिये (ज्ञानेंद्रिये म्हणण्याची प्रथा आहे) असतात हे
चक्क चूक आहे. मग इतर ग्रहणेंद्रिये कोणती?

भौतिकीमध्ये जी बल नावांची अत्यंत कळीची संकल्पना आहे ती अ-व्याख्येय आहे. बलावरून वस्तुमान निगमित केलेले आहे. बल हे प्राथमिक अधिदत्त(प्रायमॉर्डियल गिव्हन) आहे. ही पिशवी जास्त जड आहे, झाकण फारच घट्ट बसलेले आहे अशा अनेकानेक स्वरूपात आपली बलाशी गाठ पडते. बलाचे ज्ञान हे प्रत्यक्ष आहे. इंद्रिय म्हणजे अवयव नव्हे तर क्षमता (फॅकल्टी). आपल्याला स्पर्शाने नव्हे तर स्नायूंतील ‘यत्नेन्द्रीय-प्रत्यक्ष’ या इंद्रियाने बलप्रत्यय येतो. किल्लीवाले कार्बन पेपर न वापरता कुठे घासायला हवे आहे हे ओळखू शकतात. सतारिये तार खेचून सुबक मींडेची हरकत काढू शकतात. ड्रायव्हर लोकांना पॉवर स्टेअरिग सुरुवातीला बिचकवते, कारण त्यांना मोटर-फीडबॅक मिळत नाही. मायेन दि बिरान या फ्रेंच तत्त्वज्ञाने १७६६ नंतर केव्हातरी यत्नेन्द्रीय-प्रत्यक्ष हे ग्रहणेंद्रीय म्हणून तत्त्वज्ञानात आणले. 

आपले शरीर अधोर्ध्व (व्हर्टिकल) दिशेशी किती कोनात आहे याचा सतत संदेश कानामधील एका अवयवातील तोलेन्द्रियामुळे मिळत रहातो. मेंदूमधील तोलेन्द्रियाचे स्थान आणि मळमळेंद्रियाचे स्थान काही व्यक्तींत फारच जवळ असते त्यांना बस लागते. दिशेचा प्रत्ययही कमीअधिक असतो गिरक्या घेतल्याने भोवळ येते. तहान भूक इत्यादी गरजा या प्रत्यक्ष ज्ञानच असतात तसेच उत्सर्जनाचे वेगही. प्रत्यक्ष ज्ञानाची पाचच इंद्रियांत अवगणना केल्याने तत्त्वज्ञानाचे मोठेच नुकसान झालेले आहे.

५)      मराठीत भरपूर वापरले जाणारे एक अनुनासिक हे वर्णमालेतून गायब आहे. म्हणजे उदा रङ्ग, सञ्च, बण्ड यात अनुस्वार न वापरता अनुनासिकाचे चिन्ह वापरले आहे तसे  एक चिन्ह गायब आहे.

  हिंदीत सन्सद-समाचार, सन्सार असे खुशाल म्हटले जाते. मराठीत आपण काहीसे संव्सद असे म्हणतो. संव्.रक्षण, सिंव्ह, संव्हिता, संव्शय किंवा मांव्स मान्स नव्हे, अंव्श अन्श नव्हे, अशी कितीतरी उदाहरणे देता येतील जे नाते ‘य’ चे ‘ञ’ शी आहे तेच नाते ‘व’ चे ज्याच्याशी आहे असे हे अनुनासिक वर्णमालेतून गायब आहे.
  आणखी एक गंमत आहे. जेव्हा माणसाच्या नावाच्या अद्याक्षरात अनुस्वार येतो तेव्हा आपण तो सरसकट म् असाच उच्चारतो. मे.पुम्. रेगे, गम्.बा. सरदार इत्यादी. खरेतर ते मेघश्याम पुण्डलीक रेगे व गङ्गाधर बाळकृष्ण सरदार असे असते! असो. 

6 comments:

  1. 1. कारण तीन बिंदूंनी एक प्रतल (plane) निश्चित करता येते. त्यामुळे जमीन जरी थोडीफार उंचसखल असली तरी स्टुलाचे पाय ज्या तीन बिंदूंना टेकतात त्यातून दर वेळेस एक प्रतल जाणारच. चार पाय आले की पाय टेकेल तो चौथा बिंदू प्रतलीय (co-planer) असेलच असे नाही.

    4. वेळेचा अंदाज, भुकेची जाणीव, वेदनेची (स्पर्श रेलेटेड नव्हे) जाणीव वगैरे? बरीच असतील ना अशी?

    5. शब्दात ’य र ल व ..... ज्ञ’ यापैकी एखाद्या अक्षराआधी आलेला अनुस्वार कसा दाखवणार?
    संज्ञा, वंश, संवाद, अंशुमान, संहिता, मांस इ.

    ReplyDelete
  2. कारण तीन बिंदूंनी एक प्रतल (plane) निश्चित करता येते. त्यामुळे . . . . . .

    राजीव साने इतकी सोपी कोडी घालण्या करता एवढा खटाटोप करतील, अस वाटत नाही. नक्कीच याच्या मागे काही तरी गूढ आहे. जसे "उड जायेगा हंस अकेला" मध्ये "हंस" म्हणजे हंस पक्षी नसतो, व "उड जायेगा" म्हणजे पंख हलवीत पक्षी उडून जाईल असे पण नसते, तसेच काहीसे. पण "तीन पायांचे स्टूल" म्हणजे काय, ते कळण्या करता एक आठवडा वाट पाहावी लागेल
    चेतन पंडित

    ReplyDelete
  3. १) सोवनी यांचे उत्तर बरोबर आहे.
    २) ‘जीवो जीवस्य जीवनं’ ला अपवाद - सहजीवनाचा (Symbiosys). उदा. मानव व कुत्रा
    ३) प्रश्नच कळला नाही
    ४) तहान, भूक, दुखणे (डोकेदुखी), खाज सुटणे, दबाव जाणवणे, ओढ/ताण जाणवणे.
    ५) म् --- स्वयम्

    ReplyDelete
  4. कोडी सोपी-अवघड असण्यापेक्षा त्यावरील मंथनातून येणारी वैचारिक शिस्त व मर्मग्राहीत्व हे राजीव सानेंना अभिप्रेत असावे, जे गूढ-गहन चिंतनासाठी पायाभूत ठरते.

    1) ज्याप्रमाणे दोन बिंदूंमधून जाणारी एक (आणि एकच) रेषा असतेच, त्याचप्रमाणे तीन बिंदूंमधून जाणारे एक (आणि एकच) प्रतल असतेच. त्यामुळे तीन पायांचे स्टूल डुगडुगत नाही. मात्र त्या तीन पायांमधील कोनावर त्याचे कलंडणे वा न कलंडणे अवलंबून असते. चौथा पाय असल्यास तो इतरांशी समप्रतल नसेल तर स्टूल डुगडुगते.
    2) अपवाद वनस्पतींचा असावा, कारण त्या आपले खाद्य सूर्यप्रकाश संश्लेषित करून 'तयार' करतात. (कीटकभक्षी वनस्पती सोडून).
    3) हा मूल्य आणि व्यावहारिकपणा यातील संघर्ष आहे. मुळातच अहिंसा हे सर्वजीव-व्यापी मूल्य असूनही ते सोयीस्कररीत्या निवडकपणे वापरले जाते.
    4) तहान-भूक, वेदना या 'जाणीवा' झाल्या. त्यांना ग्रहणेंद्रिये कसे म्हणता येईल? ज्यामुळे एखादी वस्तू किती जड आहे ते कळते अशा स्नायूबलाला ग्रहणेंद्रिय म्हणता येईल.त्याचप्रमाणे डोळे मिटून गाडीत बसलो असताना गाडीचा वेग ज्या इंद्रियांमुळे कळतो तीही ग्रहणेंद्रियेच म्हणता येतील.
    5) सोवनी यांनी म्हटल्याप्रमाणे 'य र ल.... ज्ञ' या व्यंजनांआधी आलेल्या अनुस्वारासाठी अनुनासिक चिन्ह वापरले जात होते का, हे माहिती नाही. त्याचा उच्चार 'औं' सारखा होतो (उदा. संहिता, अंश, संलग्न, हंस) हे विचार करताना लक्षात आले आणि 'सिंहगड' चा उच्चार 'सिंव्हगड' असा करावा हेही ऐकलेले आठवले.

    वैचारिक खाद्य पुरवल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  5. अतिशय उत्कृष्ट, छान व सुटसुटीत मर्मविश्लेषण.
    काही मर्मज्ञ वाचकांनी या प्रश्नांची उत्तरे देण्याचा छान प्रयत्न केला आहे.

    तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण एक गोष्ट मूलभूत गृहीत धरतो आहोत कि रेडे आणि म्हशी यांचा जन्माचा sex ratio 1:1 आहे. रेड्यांचा जन्मदर हा म्हशींच्या जन्मदराइतकाच असतो का, हे मला माहिती नाही. (असा असण्याची शक्यता मनात आली, कारण मधमाश्यांमध्ये हा दर खूपच वेगळा असतो). मंदार यांनी म्हटल्या प्रमाणे हा विषय आर्थिक आणि भावनिक अपेक्षा यातील संघर्षाचा आहे आणि म्हणूनच बराच घोटाळ्याचा आहे.

    ‘अंव’ असा उच्चार दर्शविणारे अक्षरचिन्ह मराठी लिपीत नाही, पण मराठीमध्ये ‘य र ल व श स ह’ वगैरे व्यंजनापूर्वी येणारा अनुस्वार असा उच्चारित होतो. आपण दिलेल्या लेखकांच्या नावाच्या उच्चारा बरोबरच अजून एक गोष्ट म्हणजे ‘पु. ल. देशपांडे’ यांच्या नावात आणि आद्याक्षरात (अद्याक्षर हे चुकीचे आहे असे मला वाटते) अनुस्वार नसताना मात्र ‘पु लं’ असे म्हटले आणि लिहिले सुद्धा जाते. (ल वर अनुस्वार दिला जातो. मात्र 'पु लम्' असे म्हटले जात नाही.)

    पुंडलिक आणि गंगाधर याच्या संक्षिप्त रूपात मात्र अनुनासिक उच्चार आहे. मराठीत आद्याक्षरे लिहिताना पहिले ‘पूर्णाक्षर’ (व्यंजन + स्वर) वापरले जाते म्हणून आद्याक्षरे अशी लिहिली जात असावीत. (अर्थात गंगाधर हे ‘गङगाधर’ असे लिहावे की ‘गंगाधर’ असे लिहावे हा [जो पर्यंत चुकीचे म्हणता येणार नाही तो पर्यंत] ज्याचा त्याचा प्रश्न. याविषयी टिळकांची एक गोष्ट प्रसिद्ध आहेच. पुण्यातील एक निष्णात डॉक्टर त्यांचे नाव वेगळ्या पद्धतीने लिहितात हे अनेकांनी अनुभवले असेल.

    मर्मजिज्ञासा रंगणार हे नक्की. धन्यवाद.

    ReplyDelete
  6. अत्यंत छान मालिका होती ही. ह्याचं पुस्तक आलं असतं तर खरंच फार छान होईल.

    ReplyDelete