Thursday, May 7, 2015

‘लुप्त’ होऊ शकते ती ‘विद्या’च नव्हे


 आपले पूर्वज कसे होते यात आपले कर्तृत्व काहीच नसते. तो अभिमानाचा किंवा शरमेचा विषय करणे चूकच असते. आपले म्हणून चांगले,’ ही भूमिका सोडून चांगले म्हणून आपले ही भूमिका घेण्यानेच आपण, सत्याकडे वा श्रेयाकडे वाटचाल करू शकतो. वांशिक/भौगोलिक वारसदारीपेक्षा वृत्तीमधील वारसदारी सांगून स्फूर्ती घेतली पाहिजे. जो सिद्धांत कोणीही पडताळून पाहू शकतो व त्यातून तो खोटाही पडू शकतो (पण अद्याप खोटा पडलेला नाही) तोच वैज्ञानिक सिद्धांत होय. या परंपरेचा प्रतिनिधी म्हणजेच, अरिस्टॉटलसुध्दा चुकू शकतो हे म्हणण्याची हिम्मत दाखवणारा, गॅलिलिओ होय. तो जर माझे स्फूर्तीस्थान असेल, तर तो कोणत्या भूमीत जन्मला व मी कोणत्या भूमीत, याने काय फरक पडतो? हे लक्षात घेता प्राचीन भारतात उच्च तंत्रज्ञान होते की नव्हते? या प्रश्नाचा भावनिक बडेजाव व्यर्थ ठरतो. तरीही प्राचीन भारताबाबत व अगदी आत्ताच्या काळातही जेव्हा निरनिराळे ज्ञान-दावे केले जातात, ते कसे पारखून घ्यावेत, याचे काही सामान्य निकष निश्चित करायलाच हवेत. नाहीतर वाद-मुद्दे एकमेकांना न भिडणारे स्क्यू मांडले जाऊन ते गोल गोल फिरत रहातात. एक निकष असा की एखाद्या क्षेत्रातील साध्या सोप्या गोष्टी सापडण्या आधीच सोफेस्टिकेटेड गोष्ट सापडणे शक्य नसते. दुसरा असा की ज्या तंत्राचे उपयोजन रुळते ते लुप्त होऊच शकत नाही.
अचाट दाव्यांची तपासणी
पुष्पक हे खरोखरीचे विमान, धृतराष्ट्राला कथन करणारा संजय म्हणजेच दूरदर्शन, गांधारीच्या गर्भाचे शंभर तुकडे म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी, गणपतीला हत्तीचे मुंडके बसविणे म्हणजे प्लास्टिक सर्जरी, अशी अनेक समीकरणे सध्या उफाळून आली आहेत. स्वप्नरंजन करून कल्पना सापडणे म्हणजे वस्तू बनविता येणे नव्हे. ज्यूल व्हर्नची कादंबरीतील पाणबुडी पुढे वास्तवात आली. पण म्हणून असे कोणीही म्हणत नाही की पाणबुडी बनवण्याचे तंत्र ज्यूल व्हर्नने शोधले. मिथकापुरता अर्थसुध्दा नेमका राखला पाहिजे. उदाहरणार्थ मारुतीचे उड्डाण ही लांब-उडी असे, उडणे नव्हे. किती लांब? हा अतिशयोक्ती अलंकार झाला. पण हे उड्डाण दाखवताना आजचे फिल्मवाले, तो उगाचच पोहल्यासारखे पाय हलवतोय, असे दाखवतात. हा मिथकाचाही विपर्यास आहे. विमानाचे वेगाने पुढे जाणे हेच तिरकस पंखांखाली हवेचा जास्त दाब निर्माण करून त्याला उचलते/तोलते. हेलिकॉप्टर चक्क वरून खाली झोत मारून स्वतःला तोलून धरते. त्याचे तरंगणे हे त्याच्या जाण्याच्या गतीवर अवलंबून नसते. त्यामुळेच हेलिकॉप्टर सर्वाधिक इंधन खाते. प्रचंड ऊर्जा खर्ची पडते. ऊर्जास्रोत कोणता आणि गुरुत्वाकर्षणावर मात करणारा उलटा दाब नेमका कसा निर्माण होतो, हे सांगितल्याशिवाय विमान हा शब्द वापरण्याचा अधिकार मिळत नाही. पारा आणि अभ्रक यांच्या संयोगाने तळपदे यांचे विमानही उडते आणि रसेश्वर दर्शनातील मोक्षही मिळतो! प्रत्यक्षात पारा आणि अभ्रक यांच्यात आंतरक्रियाच होत नाही! न्यायमूर्ती रानडे तेव्हा उपस्थित होते. अशा दाव्यांनी, तळपद्यांचे विमान उडाले असे सिद्ध होत नाही. कोणीही पारा आणि अभ्रक यापासून ऊर्जा उत्पन्न करून दाखवावी, प्रश्न संपला! विमान ही फार पुढची गोष्ट झाली. पुराणातदेखील, ज्याला घोडे लागत नाहीत असा रथ तरी आढळतो काय? युधिष्ठिराचा जमिनीपासून दोन बोटे वर चालणारा रथ (हॉवरक्राफ्ट?)असला तरी त्याला घोडे लागतातच. गेला बाजार पवनचक्कीतले, शिडांमधले, पतंगांमधले एअरोडायनॅमिक्स जर मांडले गेले असते तर पुढे विमानाची बात!
जी सत्ये चिंतनगम्य असतात त्यांचे आकलन कदाचित कोणत्याही काळात होऊ शकेल.
भूमितीची प्रमेये ही एकदाही निरीक्षण न घेता सिद्ध होतात. अशा सिद्धांतांना व्यवहाराची जोड लागत नाही. पायथागोरसच्या अगोदर आम्ही! ही निदान सैद्धांतिक शक्यता तरी आहे. पण कॉम्प्रेसरचा मागमूस नसताना रेफ्रिजरेशन हे असूच शकत नाही. माठ, म्हणजे बाष्पीभवनाने थंडावा, म्हणजे फक्त उष्णता खर्ची पाडून घटविणे, जे जिभेवर श्वासांचा मारा करून कुत्रासुध्दा करतो! कमी तापमानावरून जास्त तापमानाकडे उष्णता पंप करणे हे कॉम्प्रेसरविना अशक्य आहे.
आपण शब्द कोणता वापरतोय आणि संकल्पना कोणती वापरतोय यात हळूच बदल करणे ही केवळ तोंड-चलाखी असते. टेस्ट ट्यूब बेबीचा बीजसंयोग जरी टेस्ट ट्यूबमध्ये झाला तरी गर्भपोषण हे नाळेद्वारेच होते. गर्भाशय व नाळेविना गर्भाला ऑक्सिजन व सर्व जीवनद्रव्ये पुरवण्याचे तंत्र पाश्चात्यांनाही(अजूनतरी) सापडलेले नाही. गांधारीच्या एम्ब्रियोचे शंभर तुकडे, तुपाने गच्च भरलेल्या डेऱ्यांमध्ये सीलबंद करून वर्षभर ठेवले, अशी महाभारतात स्पष्ट नोंद आहे. नुसत्या तुपातून त्यांना ऑक्सिजनादि सर्व काही कसे मिळाले? आणि सत्त्वगुणाचा महामेरू असे जे तूप, त्यातून तामसी/आसुरी असे कौरव कसे काय निपजले? हा एक भारतीय प्रश्न आहेच. कशालाही काहीही म्हणणे ही सहेतुक बेशिस्त हे अशा दाव्यांचे एक वैशिष्ट्यच आहे. मुंडके-रोपण म्हणजे प्लास्टिक सर्जरी नव्हे. प्लास्टिक सर्जरी त्याच शरीराच्या त्याच टिश्यूने फक्त बाह्यात्कारी केली जाते. अगदी आजच्या काळातही मुंडक्याच्या लंबमज्जेतील सर्व तंतू, तुटलेल्या मज्जारज्जूला तसेच शिरेला-शीर धमनीला-धमनी वगैरे जोडणे शक्य नाही. सख्या भावाचा अवयवही परका म्हणून रिजेक्ट होऊ शकतो. एखाद्या पेशीच्या जीनोममध्ये किंचित बदल झाला तरी कॅन्सरची भीती असते. हत्तीचा जीनोम आणि माणसाचा जीनोम म्हणजे काय होईल याची दावा करणाऱ्यांना कल्पना तरी आहे का? आंघोळीला गेले आहे. आत येऊ नये. एवढी पाटी लावण्याची किंवा दाराला कडी घालण्याची टेक्नॉलॉजी नसताना, मुंडके-रोपणाची होती, असे निदान पंतप्रधानांनी तरी म्हणू नये.
आयुर्वेदिक औषधात जी गुणकारी आहेत त्यांच्यात नेमका कोणता रेणू गुणकारी आहे हे सापडले की ते औषधशास्त्र बनते. उष्ण-थंड, कफ-वात-पित्त अशा सबगोलंकारी संज्ञांनी सैद्धांतिक व्यूह बनत नसतो. असिडीटीला पित्त म्हटले जाते पण पित्त हे अल्कलाइन असते! पोटातला गॅस आणि सांध्याच्या द्रवातील बुडबुडे हाही गॅसच, अशी साम्ये एकाच विकाराची(वात) मानण्याला कार्यकारणभाव म्हणणे कठीण आहे. पाणिनीच्या व्याकरणाचा संगणकप्रणाली बनविताना नेमका काय उपयोग केला हे विजयशास्त्री भटकर यांनी एकदा तरी प्रकाशित करावेच. नुसता उल्लेख करून मोकळे होता येणार नाही.
भारताचे हुकले कोठे?
या कशाचीही उत्तरे मिळत नाहीत कारण आमच्यात म्हणे डॉक्युमेंटेशनची पद्धतच नव्हती! मग ज्योतिषशास्त्राचे डॉक्युमेंटेशन इतके चोख कसे? मंत्रांसारखा परिमाण देणारी यंत्रे या आकृत्या काढता येतात मग उपकरणांच्या आकृत्या का काढता आल्या नाहीत? ज्याचे उघड उघड अप्लिकेशन होते त्याचे मौखिक का होईना पण डॉक्युमेंटेशन होतेच. शेतीतले, कारागीरीतले ज्ञान त्यातील सर्वांना पोहोचत होतेच. एखादी गोष्ट करता येणे आणि तिची रीत सांगता येणे यात प्रचंड फरक असतो. आपण सगळेच सहजगत्या सुरगाठ बांधतो. कागदावर सुरगाठीची रीत लिहून पहा म्हणजे सिद्धी आणि विद्या यातला फरक कळेल. सिद्धी ही नुसती सु-श्रुत असून पुरते. विद्या ही मात्र सु-नोंदित आणि हस्तांतरणीयच असली पाहिजे.   
सिद्धी प्राप्त होणे ही गोष्ट, स्वरूपतःच वैयक्तिक असते. विद्या ही सार्वत्रिक असते. फक्त शुक्राचार्यांनाच जी प्राप्त असते ती सिद्धी. म्हणूनच संजीवनी ही विद्या म्हणणे चूक आहे. वैयक्तिक, साक्षात्कारी आणि अपवादात्मक उपलब्धी म्हणजे विद्या नव्हेच आणि विद्या देण्यात जो कृपण/आखडू असतो तो गुरूच नव्हे. आज पेटंट घेण्याची सक्ती आहे. ते पाडून ठेवणे व इतराना मात्र न मिळू देणे यावर बंदी आहे. मर्यादित कालावधीत मानधन घेतल्यावर ते ज्ञान सर्व मानवजातीचे होतेच. हे पेटंटचे खरे सार आहे. सार्वत्रिकीकरण हे आधुनिक विज्ञानाचे प्राणतत्त्व आहे. कृपणता, गुप्तता, ज्ञान-अनधिकार ही जिज्ञासा-द्रोहाची लक्षणे आहेत. कोणालाच नाही मिळाले आणि माझ्या बरोबर सरणावर गेले तरी चालेल पण बिनवशिल्याच्या शिष्याला, कुळा-बाहेरील, जाती-बाहेरील, परक्याला मिळू देणार नाही, ही खत्रूड वृत्ती म्हणजे गुरुमहिमा आणि पेटंट म्हणजे धंदेवाईकपणा, असे म्हणून आपण आपलेच नुकसान करून घेत आलो आहोत.

भारतातील तत्त्वचिंतन मोक्ष-पुरुषार्थासाठीच झाले. इतर पुरुषार्थ, तत्कालीन संकेतांवर आणि धुरीणांवर सोडले गेले.  नित्य तेच सत् अनित्य ते असत्, या आग्रहापायी आपण फरक कसा पडत नाही हे सिद्ध करत राहिलो व पाश्चिमात्य फरक कसा पडतो हे शोधत राहिले. वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था यातील अन्यायाचा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवला तरी अमूर्त-चिंतन आणि मूर्त-हस्तकौशल्य या दोहोत संबंध न उरणे या गोष्टीमुळे विज्ञानाच्या गर्भधारणेतच अडसर उत्पन्न झाला हे निश्चित.

8 comments:

  1. बर जाल लिहलस ! पूर्वजांच्या कथा सांगणारे वारसदार सध्या फार बोकाळलेत !

    ReplyDelete
  2. बर जाल लिहलस ! पूर्वजांच्या कथा सांगणारे वारसदार सध्या फार बोकाळलेत !

    ReplyDelete
  3. ब्लॊग छान झाला आहे. डिझाईन पण छान आहे. आता सातत्याने मेंटेन करणे हे काम करायचे आहे.

    ReplyDelete
  4. अतिशय सुरेख लिहिलेला लेख आहे. सध्याचा काळ हा गचाळ संस्कृतीचा परमोच्च बिंदू आहे. भारतातील आपण वापरतो ती एकूण एक गोष्ट ही परदेशात बनविलेली आहे आपण फक्त ती गचाळ पद्धतीने वापरतो . उदा ध्वनिक्षेपक शास्त्र म्हणजे काय हे आपल्याला उमगलेले नाही हे शास्त्रीय संगीत या शब्दावरून कुणालाही कळेल . आपली मोजमापेच इतकी गचाळ होती की शास्त्र त्याशिवाय शक्यच नव्हते तांब्याच्या घंगाळात भोक पडलेले भांडे बुडेल तेव्हा काही काळ मोजला जाई ते पुन्हा काढून ठेवणे यात जो कालव्यय होई तो मोजणे नसे.

    ReplyDelete
  5. विद्न्यानाच्या ताटाखालच्या मांजरानी इतरांना बोकाळले आहेत असे म्हणणे हा एक विनोद आहे.

    ReplyDelete
  6. Just saw your blog today and read a few contributions.... you have a new follower :-) Very well put Rajiv.

    ReplyDelete