Thursday, May 7, 2015

मर्मजिज्ञासा प्रस्तावना


प्रश्नमंजुषा किंवा क्विझ यासारख्या खेळातून होणारे शिक्षण मुख्यतः माहितीप्रधान आणि कौशल्यप्रधान झाले आहे. अप्रस्तुत आणि संदर्भहीन माहितीसंचय डोक्यात साठवून काही सेकंदात बाहेर काढण्याच्या नैपुण्यावर क्विझसम्राट तयार होत असतात. पण माहिती आणि चातुर्य एवढेच जीवनात पुरेसे नसते, तर बुचकळ्यात पाडणारे आणि खोलात शिरून विचार करायला लावणारे प्रश्नही आपल्याला पडत असतात. अशा प्रकारचे दृष्टिमूलक प्रश्न संकलित करून त्याद्वारे वाचकांशी संवाद साधणारे हे सदर `दै. सकाळ’ मधे १९९६-९७ च्या दरम्यान प्रसिद्ध झाले होते. हे सदर शंका-समाधान करणारे  नसून आपल्या नेहमीच्या निःशंकतेबाबत असमाधान निर्माण करणारे आहे.  त्यातील निवडक भाग ब्लॉगवर ‘मर्मजिज्ञासा’ मधे देणार आहे. आज त्या लेखमालेची प्रस्तावना.....

अर्जुनाच्या एकाग्रतेमुळे तो उत्तम विद्यार्थी ठरला. त्याला लक्ष्य म्हणून ठेवलेल्या पोपटाच्या डोळ्याखेरीज अन्य काहीही दिसत नसे. शरसंधान कसे करावयाचे याबाबत तो परिपूर्ण होता; परंतु ते कशासाठी करायचे, ते योग्य की अयोग्य, असे प्रश्न येताच अर्जुनाच्या परिपूर्णतेचा एकांगीपणा उघड झाला. ‘नैपुण्य’ मिळाले पण ‘पुण्य’ काय हे समजेना आणि भगवंतांना गीता सांगावी लागली.

आज औपचारिक शिक्षण, तसेच प्रश्नमंजुषा (क्विझ) सारख्या खेळातून होणारे अनौपचारिक शिक्षण हे मुख्यतः माहितीप्रधान आणि कौशल्यप्रधान झाले आहे. अप्रस्तुत आणि संदर्भहीन माहितीसंचय डोक्यात साठवून काही सेकंदात बाहेर काढण्याच्या नैपुण्यावरगुणवत्ता यादीतलेतसेच क्विझसम्राट तयार होत आहेत. टेलिफोन डिरेक्टरी पाठ करण्यासारखेच हे निरर्थक आहे. माहिती हवी तेवढी साठवण्याची व हवी तेव्हा मिळविण्याची एवढी उत्तम साधने असताना त्यासाठी हा मानवी मेंदूचा अपव्ययच म्हणावा लागेल. दुसऱ्या प्रकारचे प्रश्नखेळ म्हणजे कोडी. बहुतेक वेळा कोडीदेखील केवळ तार्किक झटापटीचे कौशल्य देणारी असतात. त्यामुळे फार तर चातुर्य वाढू शकते; परंतु जीवनात नुसते चातुर्य पुरेसे तर नसतेच, पण योग्य शहाणपणा अभावी, विवेकाअभावी ते घातकही ठरू शकते.

याउलट झेन गुरुपरंपरेतले शिष्यांना पेचात टाकणारे प्रश्न किंवा युधिष्ठराला यक्षाने विचारलेले प्रश्न हे माहिती व चातुर्य नव्हे, तर मर्मदृष्टी (insight) व मूल्यविवेक (value judgement) जागृत करणारे प्रश्न होत. आपल्यालाही बुचकळ्यात टाकणारे आणि खोलात शिरून विचार करायला लावणारे प्रश्न पडत असतात. अशा प्रकारचे दृष्टिमूलक प्रश्न संकलित व सूत्रबद्ध करून त्याद्वारे वाचकांशी संवाद साधून पाहणारे, हे सदर आहे.
प्रत्येक अंकात एक प्रश्नसंच दिला जाईल. पुढील सप्ताहात त्यावरील प्रश्नांची चर्चा असेल व पुढील प्रश्नसंच दिला जाईल. प्रश्नांची चर्चा म्हणण्याचे कारण असे, की या प्रश्नांना दरवेळी एकच एक निश्चितबरोबरउत्तर असेलच असे नाही. त्याला अजून शोध घ्यायला वाव असेल किंवा आपापल्या मूल्यसरणीनुसार भिन्न मत असण्यालाही वाव असेल. काही प्रश्न सरळ माहितीवजा असतील. पण हा माहितीचा तुकडा एखाद्या दृष्टीची वाट मोकळी करणारा असेल. काही प्रश्न सर्वत्र पसरलेले गैरसमज उघड करणारे असतील, काही संकल्पना स्पष्ट करण्यास मदत करणारे असतील. काही तर्कदोष कोणते याची ओळख करून देतील. काही आपण, कोणती मूल्ये मानतो याची स्पष्टता करून देतील. कदाचित काही प्रश्न हे प्रश्न म्हणूनच चुकीचे असतील.

ही स्पर्धा नाही, तर चिंतनाला निमित्त आहे. अर्थातउत्तरांशी मतभेद कळवणे किंवा वेगळे प्रश्न सुचवणे याचे स्वागतच आहे.

5 comments:

  1. खऱ्या अर्थाने शिकन्याची प्रक्रिया

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Rajiv Sir,

    This would be really interesting...looking forward to the series..

    ReplyDelete
  4. Rajiv Sir,

    This would be really interesting...looking forward to the series..

    ReplyDelete
  5. Asking quesions-good questions requires intelligence. चांगले प्रश्न विचारण्यासाठी कुशाग्र बुद्धि लागते.

    ReplyDelete